शिवसेना एक लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुरवणार शालेय साहित्य
मुंबई/कोल्हापूर: या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात फार मोठं नुकसान झालं. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर पुराने बरेच दिवस तळ ठोकून ठेवला होता.
पूरग्रस्त लोकांना महाराष्ट्रातल्या सर्व भांगांतून मोठ्या प्रमाणात मदत पोहचवण्यात आली. अद्यापही अनेक स्वयंसेवी संस्थांकडून हे काम चालू आहे. इतर राजकीय पक्षांसह शिवसेनेचे जवळपास सर्व प्रमुख पदाधिकारी या वेळी पूरग्रस्त भागात मदतकार्य करताना दिसले. याच मदतीचा पुढचा टप्पा म्हणून शिवसेनेतर्फे पूरग्रस्त भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. ज्यात दप्तर(स्कूल बॅग) व त्यामध्ये वह्या, पेन्सिल, बॉलपेन, पट्टी इत्यादी शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ४९२९१, सातारा जिल्ह्यातील ५९१० व सांगली जिल्ह्यातील २८८६३ तसेच कोकणातील १६००० असे मिळून १ लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दप्तरे व लेखनसाहित्य दिले जाणार आहे.