“आरबीआयकडून चोरण्याचा काहीच फायदा होणार नाही”; राहुल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका
नवी दिल्ली: आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरून देशात राजकारण तापायला एव्हाना सुरुवात झाली आहे. काल सोमवारी रिझर्व बँकेच्या गंगाजळीतील वरकड सरप्लस रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. यानुसार १.७६ लाख कोटी रुपये सरकारला मिळणार आहेत.
थोड्याच वेळापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर याच विषयाला धरून टीका केली आहे. ते म्हणाले की, “स्वतः निर्माण केलेले आर्थिक संकट कसे सोडवावे याबाबत पंतप्रधान आणि अर्थमंत्री गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. (आरबीआय) रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून चोरण्याचा काहीच फायदा नाही. हे म्हणजे असं झालं की एका दवाखान्यातून बँडेज चोरणं आणि ते बंदुकीची गोळी लागून झालेल्या जखमेवर चिकटवणे.”
या मुद्यावरून देशात सध्या अर्थ तज्ञांमध्येही दोन गट पडल्याचे दिसत आहे.