मॉन्सूनपूर्व पावसाने मुंबई शहर व कोकण किनारपट्टीला केले खुष
मुंबई: प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबई व कोकण किनारपट्टीवरील लोकांना काल रात्री मॉन्सूनपूर्व पावसाने हॅपी मॉन्सून केलं. विजांच्या कडकडाटात हजेरी लावत चाकरमानी मंडळींची त्रेधातिरपीट उडवून लावली. या पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका बसला.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल परिसरात पावसाने जोरदार सरींचा वर्षाव करत हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली होती. पहिल्याच पावसाने उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील वाहतुकीची दाणादाण उडवली.
ऑफिस वरून घरी जाताना छत्र्या-रेनकोट नसल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. हवेतल्या कुंद गारव्याचा आंनद घेत बऱ्याच जणांची पावलं वडापाव-भजी च्या गाड्यांकडे वळली.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने सलग तिसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व सरींचा वर्षाव केला. धोधो कोसळणाऱ्या पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज व फोन सेवा खंडित झाली होती.