मुंबईतील गोरेगांव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे आयोजित व्याख्यानाला लाभला जाणता श्रोतावर्ग
“खाना है तो यही खाना है, नहीं खाना है तो यही खाना है..” अशी सोशल मिडियाच्या बाबतीत आपली सगळ्यांची अवस्था झाली आहे. २००० नंतर जन्माला आलेले Digital Natives आणि त्याआधीचे Digital Immigrants अशा माणसांच्या दोन प्रकारांमध्ये जग विभागलेलं आहे. आपण असतो कसे यापेक्षा दृश्य माध्यमं आल्यानंतर आपण दिसतो कसे याला महत्व येत गेलं. अंगी बाणवलेल्या गुणांपेक्षा सुंदर दिसणं आणि तुमच्याकडच्या महत्वाच्या वस्तूंचं प्रदर्शन करणं याला महत्व येत गेलं. सोशल मिडियानं तर एका माणसात दोन व्यक्तिमत्वं तयार केली. एक वास्तवातलं व्यक्तिमत्व आणि एक सोशल मिडियावरचं आभासी, लोकांच्या नजरेत सगळं काही खुशाल आहे असं लोकांना भासवण्यासाठी तयार केलेलं व्यक्तिमत्व. या दोन व्यक्तिमत्वांमधल्या विभागलेल्या माणसाला यामुळे नैराश्य, मोबाईलचं व्यसन, बळावलेली स्वकेंद्रित वृत्ती, नात्यांमधले तुटत चाललेले संबंध – टेक्नोफरन्स (टेक्नॉलॉजीचा इंटरफरन्स), फेसबुकसारख्या अॅपवर तुलनेचा अतिरेक, भयावह प्रमाणात वाढलेलं ट्रोलिंग, आॉनलाईन फसवणुकीचे सेक्स्टॉर्शनसारखे वाढते प्रकार, सायबरबुलिंग, मी काहीतरी सारखं गमावतो आहे अशी भीती – फिअर आॉफ मिसिंग आऊट, सहजी स्वस्तात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन आणि डेटामुळे पोर्नोग्राफीचं व्यसन असे मानसिक; तसंच निद्रानाश, हेडफोनच्या अतिरेकानं बहिरेपणाकडे वाटचाल, सतत मान खाली घालून मोबाईल पहाण्यामुळे मानदुखी आणि पाठदुखी, बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि त्यातून उद्वभणारे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असे अनेक शारिरिक विकार भेडसावू लागले.
गुहाचित्रांपासून, छापील माध्यमं, दृकश्राव्य माध्यमं, डिजिटल माध्यमं आणि आता समाजमाध्यमं कम्युनिकेशनसाठी म्हणजेच संवादासाठी विकसित झाली. त्याचे एकमेकांना मदत करणं, समविचारी लोकांचे ग्रुप्स तयार होणं, व्यसनांवर किंवा इतर समस्यांवर समदु:खी लोकांच्या ग्रुप्समुळे मदत होणं, छोट्यात छोट्या व्यवसायाला ऑनलाइन मार्केटिंगची संधी उपलब्ध होणं, जगात कुठूनही कोणतंही शिक्षण घेता येणं असे अनेक फायदे आहेत. पण माणसानं माणसाच्या जवळ येण्यासाठी विकसित झालेला सोशल मिडिया माणसाला कमालीचं एकाकी आणि बेचैन करतो आहे. यामागची कारणं आणि उपाय यावर नीलांबरी जोशी यांचं “समाजमाध्यमं : शाप का वरदान“ या विषयावरचं व्याख्यान शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी “केशव गोरे स्मारक ट्रस्ट” आणि “पुन्हा भेट” यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगांव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे आयोजित करण्यात आलं होतं.
जवळपास दोन तास चाललेल्या या व्याख्यानात लेखिका नीलांबरी जोशी यांनी आॉनलाईन शिक्षण, वैद्यकीय मदत, एकमेकांचे विचार सहजपणे एकमेकांपर्यंत पोचवता येणं, समविचारी माणसं/संस्था एकत्र येऊ शकणं, सामान्य माणसालाही आपला आवाज समुदायापर्यंत पोचवण्याची संधी मिळणं, सामाजिक पातळीवर एकमेकांना मदत होणं, आपली उत्पादनं आणि सेवा यांच्या मार्केटिंगसाठी उपयोग –असे सोशल मिडियाचे विविध नफायदे कथन केले. याच सोबतीला त्यांनी सायबरबुलिंग, हिंसा वाढणं, सेक्स्टिंग, ट्रोलिंग, सोशल मिडियाचं व्यसन, नो मोबाईल फोबिया(Nomofobia), फेसबुक डिप्रेशन, तुलना, ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन, इंटरनेट गेमिंग डिसआॉर्डर, झोपेवर होणारे परिणाम, पालक-मुलं आणि सर्व प्रकारच्या नात्यातले विसंवाद वाढणं असे समाजमाध्यमं (सोशल मीडिया) चे अनेक तोटेही उपस्थितांसमोर मांडले. लेखिका नीलांबरी जोशी यांचं माध्यम विश्वाचा आढावा घेणारं ‘माध्यमकल्लोळ’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं असून ‘सोशल मीडिया’ या विषयाचं सखोल विश्लेषण करणारं वर एक वेगळं प्रकरणचं त्यांनी यात लिहिलं आहे.