आघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांच्या या नव्या ग्रंथाबाबत सविस्तरपणे जाणून घ्या
मराठी साहित्य विश्वातील एक आघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांच्या ‘माध्यमकल्लोळ’ या माध्यम विश्वाचा विस्तृतपणे धांडोळा घेणार्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे दिमाखात पार पडला. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, माध्यम अभ्यासक समीरण वाळवेकर, ज्येष्ठ पत्रकार रवि आमले, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.
गेल्या चार वर्षांपासून नीलांबरी जोशी ‘माध्यमकल्लोळ’ लिहिण्याच्या प्रक्रियेत होत्या. या काळात त्यांनी जगभरातील शेकडो पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, लेख, संशोधनपर निबंध, माध्यम विश्वाशी संबंधित दुर्मिळ दस्तऐवज इत्यादींचे अव्याहतपणे वाचन केले. या आधी मानसशास्त्राशी संबंधित मनःकल्लोळ तर कॉर्पोरेट जगतातील घडामोडींचा सखोल आढावा घेणार्या ‘कॉर्पोरेट कल्लोळ’ सारखी बेस्ट सेलर पुस्तकं लिहिली. त्यामुळे या नंतर नीलांबरी जोशी काय लिहिणार आहेत याचं औत्स्युक्य वाचकांमध्ये होतं. अखेर काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘माध्यमकल्लोळ’ या आपल्या नव्या ग्रंथाच्या प्रकाशनाची घोषणा केली. या पुस्तकाला ग्रंथ असं आम्ही का म्हणतोय हा प्रश्न नक्कीच सार्यांना पडला असेल. याचं उत्तर असं की ५६५ पानांचा हा ग्रंथ पत्रकार, सोशल मीडिया मॅनेजर्स, माध्यम सल्लागार, विविध संस्थांतील जनसंपर्क अधिकारी (PRO), मार्केटिंग प्रोफेशनल्स, मास मीडिया/पत्रकारितेचे विद्यार्थी अगदी सोशल मीडिया इंफ्लूएनसर्स यांच्यासाठीही येत्या काळात एक दिशादर्शक, ज्ञानाचा खात्रीशीर स्त्रोत म्हणून भूमिका बजावणार यात काही दुमत नाही.
‘माध्यमकल्लोळ’ या आपल्या नव्या ग्रंथाची ओळख लेखिका नीलांबरी जोशी काहीशी सविस्तरपणे करून देत आहेत.
“या पुस्तकात एकूण तीन भाग आणि दहा प्रकरण आहेत. पहिल्या ओळख या भागातल्या पहिल्या प्रकरणात आज सोशल मीडियामुळे आपण मानसिक स्वास्थ्य कसं हरवून बसलो आहोत त्याच्या कारणांबद्दल थोडक्यात लिहिलं आहे. ‘इसापनीती’ सारख्या मौखिक कम्युनिकेशन पासून इंटरनेट पर्यंत माध्यमांचा विकास कसा होत गेला याचा आढावा दुसऱ्या प्रकरणात आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग माध्यमांचा विकास आणि त्याचे मानसशास्त्रीय परिणाम हा सहा प्रकरणांमध्ये विभागला आहे. ग्राहक ही माणसाची ओळख औद्योगिक क्रांतीनंतर वाढत गेली. माणसाला ग्राहक बनवण्यात जाहिरातींचा कसा हात होता हे पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात लिहिलं आहे. किती वेळा जाहिरात दाखवली तर मानवी मेंदूवर कसा परिणाम होतो, त्यानुसार जाहिरात कशी दाखवावी याबद्दलच्या मार्केटिंगच्या थेअरीज कशा विकसित झाल्या? त्यानुसार लहान मुलं स्त्रिया यांना मोहात पाडणाऱ्या जाहिराती कशा तयार केल्या गेल्या; मुलांनी पालकांकडे वस्तू घेण्याचा हट्ट करावा यासाठी काय करता येईल यावर मानसशास्त्रज्ञांनी कसं योगदान(!) दिलं अशा गोष्टी या प्रकरणात वाचायला मिळतील.
माध्यमांमुळे हिंसा वाढते का? हा प्रश्न सतत चर्चेत असतो चौथ्या प्रकरणात निरनिराळ्या माध्यमांमधून दिसणाऱ्या हिंसेचा समाजात उमटणाऱ्या हिंसेवर परिणाम होतो का? माध्यमांमध्ये हिंसा पाहून मानसिकता बदलते का यावर मी लिहिलं आहे. माध्यमांमुळे चंगळ वाद कसा वाढीला लागतो यावर पाचव्या प्रकरणात लिहिताना मी आपण कन्सुमर कसे बनत गेलो त्याचा इतिहासही लिहिला आहे.
सौंदर्य सौंदर्य प्रसाधनांमुळे आणि जंग फूड मुळे होणारे शारीरिक आणि मानसिक परिणामही या प्रकरणात वाचायला मिळतील. ग्राहक म्हणून वस्तू विकत घेताना ग्राहकाचं मानसशास्त्र हा विषय महत्त्वाचा असतो. रिचर्ड थीलर या अर्थशास्त्रज्ञाला यासाठी २०१७ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं. ऑनलाइनच्या विश्वात तर आपली मानसिकता वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी वळवण्याकडे कंपन्यांचा आटापिटा चालू आहे. त्यामुळे ‘बिहेवियरल इकॉनॉमिक्स’ या विषयावरही मी या प्रकरणात दोन लेख लिहिले आहेत. जनसामान्यांची मतं हवी तशी वळवून घेण्यासाठी अजून एक हत्यार कायम वापरलं जातं ते म्हणजे प्रोपागंडा! माध्यमांचा वापर प्रोपागंडासाठी गोबेल्स पासून अनेकांनी कसा करून घेतला ते या पुस्तकाच्या सहाव्या प्रकरणात मांडलं आहे.
आजच्या जगात माध्यमांमुळे ज्या दोन गोष्टींनी माणसाची झोप खरोखर उडवली आहे त्या म्हणजे पोर्नोग्राफी पाहण्याचे व्यसन आणि टीव्ही-वेब मालिकांचा अतिरेक. माणसाची झोप हा आमचा स्पर्धक आहे हे नेटफ्लिक्सचा संस्थापकाचं वाक्य त्यामुळेच मध्यंतरी खूप गाजलं. या दोन गोष्टींबद्दल मी अनुक्रमे सातव्या आणि आठव्या प्रकरणात लिहिलं आहे. पुस्तकाचा तिसरा भाग सोशल मीडिया हा आहे. या भागात फिल्टर बबल्स, सायबर बुलिंग, सेक्सटिंग, नोमोफोबिया, टेक्नोफरंस, ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन, टिक टॉक चे दुष्परिणाम, ट्रोलिंग, समाज माध्यमांमुळे वाढलेलं नैराश्य आणि नार्सिसिझम, समाज माध्यमांमुळे वाढलेली तुलना, लाईक्सचा चकवा, समाज माध्यमांचा झोपेवरचा परिणाम, फेक न्यूज आणि समाज माध्यमांच्या व्यसनातून बाहेर येण्याचे उपाय यावर एकूण २३ लेख आहेत.
हे पुस्तक लिहून झाल्यानंतर सहजच सायकॉलॉजी टुडे या वेबसाईटवर एक लेख वाचला. डॉक्टर बर्नार्ड लस्किन या मानसोपचार तज्ञानं लिहिलेल्या त्या लेखात माध्यम व मानसशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचे नवीन शिक्षणक्रम सुरू झाल्याबद्दल लिहिलं होतं. लस्किन स्वतः एज्युकेशन सायकॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी या विषयातले कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉक्टर आहेत. फॉर्च्यून ५०० मधल्या अनेक कंपन्यांच्या विभागांचे ते अध्यक्ष आहेत. अनेक पुस्तकं टीव्ही मालिका यांचे बेस्ट सेलर लेखक असलेले लष्किन अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या मीडिया सायकॉलॉजी विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांना मी त्यांचा लेख आवडल्याचं आणि माझ्या पुस्तकाबद्दल ई-मेल लिहिल्यावर त्यांचा माझ्या पुस्तकाला शुभेच्छा देणारा मेसेज आला.
लस्किन यांच्या लेखानुसार ‘माध्यमं आणि मानसशास्त्र’ हा लेख महत्त्वाचा ठरत असल्यामुळे या शाखेतलं शिक्षण अमेरिका आणि युरोप मधल्या काही देशांमध्ये आता उपलब्ध आहे. मानसशास्त्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोग होईल आणि या विषयाचं भवितव्य याबद्दल मी पुस्तकाच्या दहाव्या आणि शेवटच्या भागात सविस्तर लिहिलं आहे. मानवतेवर घाला घालणारी हत्यारं परजत उभ्या असलेल्या माध्यमांमुळे आपली विचारशक्ती क्षीण होत चालली आहे. एकमेकांशी असलेलं सहचार्य आणि सामंजस्य आपण गमावत चाललो आहोत.
माणूस म्हणून आपलं अस्तित्व आणि मानवतावाद टिकवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी आहे या पुस्तकामुळे त्याला किंचितसा तरी हातभार लागावा.”
पुस्तक घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा