“शरद पवार यांच्या ‘पुलोद’ सरकारमध्येही भाजप-जनसंघाचे लोक होते” : संजय राऊत
“येणारी २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा. आम्ही सतत असं म्हणणार नाही की मी परत येईन, मी परत येईन.” असे म्हणत संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. आज संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी अल्प संवाद साधला. यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला की राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार बनणार असून महाराष्ट्राचं नेतृत्व शिवसेनाच करणार. कोणी लाख प्रयत्न केले तरी कोणी आम्हाला रोखू शकत नाही.
वीर सावरकरांवरील प्रश्नावर ते म्हणाले की, “वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची भूमिका आमची असून याबाबत कोणी आम्हाला शिकवू नये.” कोणत्याही किमतीवर महाराष्ट्रात भाजपचे सरकार करू या नारायण राणेंच्या वक्तव्यावरील प्रश्नावर त्यांनी तिरकस भाषेत त्यांना या कामासाठी शुभेच्छा दिल्या.
पुढे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभिन्न विचारधारेचे सरकार बनवताना शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, “अटलबिहारी वाजपेयी यांचं पहिलं सरकार हे विभिन्न विचारधारेच्या पक्षांना एकत्र करून बनवण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या ‘पुलोद’ सरकारचेही उदाहरण दिले. शरद पवार यांच्या या सरकारमध्ये भाजप-जनसंघाचे लोक होते याचा त्यांनी पुनरुच्चार केला.