महाशिवआघाडीच्या दिशेने दो कदम आगे, शिवसेनेच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात युवा काँग्रेसनेते विश्वजीत कदम यांची उपस्थिती
सांगली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. आधी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील नेवरी मळा, आंबेगाव भागातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष, टोमॅटो, मका, पपई, डाळिंब व इतर शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिवसेना शेतकरी मदत केंद्राला भेट देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि बागायतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना धीर आणि दिलासा दिला.या कठीण प्रसंगात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा विश्वास उद्धव साहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतरे, उपनेते नितीन बानगुडे व विशेष म्हणजे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते. सध्या शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापने बाबत चर्चा चालू आहे. त्यामुळे सेनेच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात विश्वजीत कदम यांची उपस्थिती म्हणजे महाशिवआघाडी च्या दिशेने दो कदम आगे जात असल्याची पावती म्हणणे अतिशयोक्ती पूर्ण ठरू नये.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी कराडरोड येथील विटा भागातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतजमीन आणि शेतपिकांची पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकरी आणि बागायतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना धीर आणि दिलासा दिला. यावेळी शेतकऱ्यांनी खचून न जाता गरज लागल्यास शिवसेनेला हक्काने हाक मारा, शिवसेना मदतीस धाऊन येईल असा धीर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.