मुसळधार बरसत पावसाने केलं श्रावणाचं स्वागत; मुंबई, ठाणे जलमय
मुंबई: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड विभागात काल रात्रीपासून पावसाची कोसळधार चालू आहे. सकाळी घराबाहेर पडल्यावर रस्त्यावर साचलेल्या पाण्याने साऱ्यांचे स्वागत केले.
काल रात्रीपासून मुंबईसह, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, बदलापूर परिसरात कोसळणाऱ्या पावसामूळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. ठाण्यातील घोडबंदर रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. या परिसरातील लोढा आणि हिरांनादानी संकुलांमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात शिरले होते.
पश्चिम उपनगरातील बोरिवली भागात तर नॅशनल पार्क मधून येणाऱ्या पाण्यामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे सेवाही बाधित झाली आहे. काही ठिकाणी रेल्वे मार्गांवर पाणी साचले होते, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे सर्व मार्गांवरील रेल्वे चे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.
कोकणातही पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास सर्व भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. सर्व नद्या दुथडीभरून वाहत आहेत. तर बाजूच्या कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती आहे. प्रशासनाने एनडीआरएफ च्या पथकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
पुढचे दोन दिवस पावसाचा जोर असाच राहील. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.