उरण मधून विजयी झालेल्या महेश बालदी यांच्या पथ्यावर पडलं शिवसेनेचं पनवेल मधलं राजकारण?
नवी मुंबई/उरण: उरण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे चुरशीची ठरली. भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी विद्यमान आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे नेते विवेक पाटील या दोन दिग्गज नेत्यांशी दोन हात करत विजयश्री खेचून आणला. महेश बलदी यांना ७४,५४९ तर मनोहर भोईर यांना दुसऱ्या क्रमांकाची ६८,८३९ तर विवेके पाटील यांना ६१,६०१ मते पडली.
जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तेव्हा उरण चे माजी नगराध्यक्ष राहिलेले महेश बालदि यांनी युतीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या ठिकाणी मग शिवसेनेनेही शहला काटशह देत पनवेल विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. ही व्यूहरचना कामी येईल आणि उरण मधून महेश बालदी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना वाटले पण तसे काही झाले नाही. या उलट बालदी यांनीही आपला अर्ज कायम ठेवला पण पनवेल मधून उमेदवारी अर्ज भरलेल्या बबन पाटील यांनी अनाकलनीयरीत्या आपला अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतला. ज्यामुळे पनवेल आणि उरण मधील सेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांत खळबळ उडाली.
उरण मधील सेनेची जागा महेश बालदी यांनी काबीज केली तर पनवेल मध्ये प्रशांत ठाकूर यांना विक्रमी १,७६,१०९ मतं मिळाली. पनवेल येथील शिवसैनिकांनी परिपूर्ण पणे भाजपचा प्रचार केला तर याविरोधी चित्र उरण मध्ये पहावयाला मिळाले. येथे तालुका भाजपच्या एखाद दुसरा अपवाद वगळता संपूर्ण फळीने बालदी यांच्यासाठी प्रचार केला. उरण विधानसभा मतदारसंघातला पराभव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागल्याचे कळते कारण या ठिकाणी त्यांनी भर पावसात सभा घेतली होती. दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही उरण येथील शिवसेनेच्या प्रचारात भाजपचे पदाधिकारी भाग घेत नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. महेश बालदी यांचे भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी उत्तम संबंध असल्यामुळे या साऱ्यांकडे वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. एकूण सध्यातरी प्रशांत ठाकूर यांना मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करावा की पनवेल येथून उमेदवारी मागे घेतल्याचा दोष वरिष्ठ नेत्यांना द्यावा अशा द्विधा मनःस्थितीत पनवेल तालुक्यातील शिवसैनिक अडकले आहेत.