नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनाने राजन साळवींना तारले, पण पक्षांतर्गत विरोधकांमुळे झाले गेल्या वेळेपेक्षा मताधिक्य कमी
रत्नागिरी: आधी जैतापूर आणि नंतर नाणार प्रकल्पामुळे वादग्रस्त ठरलेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राजन साळवी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादित करत ह हॅट्रिक साधली आहे. त्यांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा पराभव केला. काँग्रेसच्या अविनाश लाड यांना मिळाली आहेत ५३,५५७ मतं तर राजन साळवी यांना मिळाली आहेत ६५,४३३ मतं. मताधिक्य राहीलय ११,८७६ मतांचं.
महाराष्ट्रातल्या काही दुर्गम मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या या मतदारसंघात उत्तम संघटन बांधणी आणि चांगल्या कामाच्या जोरावर राजन साळवी यांनी हे यश मिळवल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
पण २०१४ च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत राजन साळवी यांचे मताधिक्य घटल्याचे दिसते. याला कारण पक्षांतर्गत राजकारण असल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या तिकीट वाटपापूर्वी राजापूर तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येत आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच या वेळी असंतुष्टांच्या या गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला छुपी मदत केल्याची चर्चा आहे. ज्याला रत्नागिरीतल्या एका माजी मंत्र्याची फूस असल्याचे मानले जाते.
पण नाणार प्रकल्प हटवण्यासाठी केलेले आंदोलन आणि विधिमंडळात केलेला विरोध या दोनही बाबींचा फायदा राजन साळवी यांना झाला इतकं नक्की.