लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा विचार करताय? मग हे जरूर वाचा
गरिमा मला तिचं स्टुडिओ अपार्टमेंट दाखवत होती. भिंतींवर गरिमा आणि तिचा जोडीदार सुकेतू यांचे सुरेख फोटोग्राफ्स होते. बाटल्यांमध्ये नेटके मनीप्लांटस होते. मागे मंद आवाजात संगीत ऐकू येत होतं. सुकेतू मांजराच्या पिल्लांबरोबर खेळत होता. सुकेतूच्या हातावर एक छोटंसं मांजराचं पिल्लू बसलेलं पाहून गरिमानं तिचा महागडा कॅमेरा आणून फोटो काढायला सुरुवात केली. त्या छोट्या अपार्टमेंटमध्ये ते दोघं सुखात नांदत होते..
फक्त दोघांना लग्न करण्यात बिलकुल रस नव्हता. दोघंजण गेले दीड वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. गरिमानं मला बुध्दिबळाचा एक डाव खेळायला बोलावलं होतं. मला त्यात फारसा इंटरेस्ट नसला तरी त्या दोघांचे लग्नसंस्थेबाबतचे विचार जाणून घ्यायचे होते.
गरिमाच्या मते लग्नानंतर आयुष्याचा वेग मंदावतो. सुकेतूलाही लिव्ह इनमध्ये रहाणं सोपं वाटत होतं. सुकेतू हॉस्टेलवर रहात असल्यापासून दोघं एकत्र रहात होतेच. मात्र अपार्टमेंट मिळवताना त्यांना त्रास झाला. दोघं एकत्र रहाणार आहेत, पण त्यांचं लग्न झालेलं नाही हे ऐकून ते समोरच्या घरमालकाला गुन्हेगारच वाटायचे. पण मग या घराच्या मालकिणीचा घटस्फोट झाला. त्यामुळे हे घर अपशकुनी मानून भाड्यानं घ्यायला कोणी तयार नव्हतं. मग ते त्यांना मिळालं.
“आमच्या मित्रांना आमच्या धाडसाचं कौतुक वाटतं. आमच्या पालकांशी आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाही. नातेवाईकांना ते रुचणार नाही असं वाटतं त्यामुळे आम्ही सांगायलाच जात नाही. सुरुवातीला शेजाऱ्या-पाजाऱ्यांनाही तिच्याबद्दल वाईट बोलायचे” असं गरिमा सांगत होती. पुढे ती म्हणाली “पण सहा महिन्यांनंतर सगळ्यांनी आमचं नातं मान्य केलं. आता ते दिवाळीला फराळही आणून देतात.”
इरा त्रिवेदी हिनं India and Love – Marriage and Sexuality in the 21st Century या पुस्तकात ही केस लिहिली आहे. तिच्या मते भारतात आजही लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार रुळलेला नाही. पण अशा जोडप्यांचं प्रमाण वाढतं आहे. भारतात लग्न (घरच्यांनी जातपात,धर्म आणि आर्थिक स्तर पाहून ठरवलेलं), मग शरीरसंबंध (सहसा दोघांच्या आयुष्यातही प्रथम) आणि शेवटी प्रेम (जोडपं लकी असेल तर) अशा मार्गानं जाणाऱ्या लग्नाचा रस्ता गेल्या दहा वर्षात खूप बदलला आहे. आता प्रेम, शरीरसंबंध आणि मग कदाचित लग्न असा मार्ग प्रचलित होतो आहे. शहरी जोडपी तरी आता प्रेम आणि सेक्स या गोष्टींना नात्यांमध्ये विशेषत: लग्नांमध्ये महत्व देतात. यातून नातं कदाचित पूर्वीपेक्षा जास्त समाधानकारक होतं असलं तरी त्यातून समाजात अनेक समस्याही उभ्या रहात आहेत.
– Live in and Extra marital relationship याच विषयावर राजेश अलोणे यांच्या मनोस्वास्थ्य संवर्धन गटासाठी मी २६ आॉगस्ट २०१९ रोजी प्रेझेंटेशन देणार आहे. कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे..!
– नीलांबरी जोशी (समुपदेशक, लेखिका – कॉर्पोरेट कल्लोळ)
मनोस्वास्थ्य संवर्धन गट
दि. २६ ऑगस्ट २०१९, वेळ-सायंकाळी ६:३० वाजता,
स्थळ – भिडे आयुर्वेदिक संस्था, संगम साडी सेंटर समोर, सदाशिवपेठ, पुणे