तुमच्या मनात काय आहे हे ऐकण्यासाठी म्हणून ही यात्रा मी काढलेली आहे : आदित्य ठाकरे
नाशिक: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे काल जन आशीर्वाद यात्रे निमित्त देवळाली येथे आले होते. या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले कि, “जन आशीर्वाद यात्रा चालू झाल्यापासून मी पाहतो आहे लोक भेटायला येत आहेत धोधो पाऊस चालू असताना देखील मला भेटण्यासाठी उभे आहे हेच प्रेम जे मला मिळत आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. गेली पाच वर्ष आपण सत्तेत असो किंवा नसो जनतेसाठी आपण निवेदने आंदोलने केली. हे करत असताना जनता आमच्या सोबत राहिली म्हणून या जनतेचे आभार मानण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा आहे.”
जन आशीर्वाद यात्रेच्या संकल्पनेबाबत बोलताना ते म्हणाले लोकसभेत आपले खासदार, आपले वाघ दिल्लीत गेले त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मतदान केलं, ज्या लोकांनी प्रचार केला त्यांचे आभार मानण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा आहे.
आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:
- हा देश तर भगवा झालेलाच आहे पण आपल्याला महाराष्ट्र भगवामय करायचा आहे.
- आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनवायचा असेल आपला महाराष्ट्र प्रदूषण मुक्त, बेरोजगार मुक्त महाराष्ट्र कर्जमुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर, प्रत्येक शिवसैनिकाने शिवसेनेचा झेंडा, शिवसेनेचे विचार, शिवसेनेचे काम प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात प्रत्येक शहरात पोहोचवायचे आहे तरच आपला महाराष्ट्र वेगाने प्रगतीकडे जाईल म्हणूनच ही यात्रेची मी सुरुवात केली आहे.
- इतर पक्ष निवडणुकीच्या वेळेला प्रचाराला येतात मतं मागतात परंतु निवडणूक झाल्यानंतर पुन्हा हा पाहतही नाहीत. शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे जो निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर देखील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत असो किंवा नसो प्रयत्नशील आहे.
- जगासाठी ही जन आशीर्वाद यात्रा असली तरी माझ्यासाठी ही तीर्थयात्रा आहे.
- शिवसेनाप्रमुखांची मला शिकवण आहे की समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के.
- आपली तीर्थयात्रा म्हणजे आपली जनता जनार्दन आहे म्हणून मी तुमच्याकडे जनतेकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
- आम्ही नेहमी बोलत असतो पण या वेळेला तुमच्या मनात काय आहे हे ऐकण्यासाठी म्हणून ही यात्रा मी काढलेली आहे.
- पाच वर्षे सत्तेत असताना आपण जनतेसाठी जे जे चांगलं करता आले ते ते केल आहे आणि यापुढेही करणार. कर्जमुक्ती ही होणारच हे माझे तुम्हाला वचन आहे.
- पिक विमा कर्जाबद्दल शिवसेनेने आंदोलन केले आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे फोन यायला चालू झाले की साहेब आम्हाला विमा कंपन्यांकडून पैसे आले आहेत हे शिवसेनेचे काम आहे.