सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा संकल्पपत्रात उल्लेख करण्यापेक्षा आधीच थेट देता आला असता’, शरद पोंक्षे यांचा भाजपला टोला
मुंबई: महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल भाजप ने आपलं ‘संकल्पपत्र’ जाहीर केलं. यात त्यांनी शेतकरी, बेरोजगारी या व्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा उल्लेख केला आहे.
यावर सावरकर प्रेमी अभिनेते व शिवसेना चित्रपट सेना पदाधिकारी शरद पोंक्षे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की, २०१४ सालापासून भाजपचं सरकार केंद्रात आहे त्याकाळातही या सर्वांना भारतरत्न देता आला असता. निवडणुकीच्या तोंडावरच याची घोषणा करण्याची गरज भाजपला गरज नव्हती.
पुढे ते म्हणाले की, “…त्यामुळे हिंदुत्ववादी, सावरकरवादी मतांचा गठ्ठा मिळवण्यासाठी हे कुठेतरी आहे की काय, अशी शंका येते. मात्र, तरीही भाजपला सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची बुद्धी झाली, याबद्दल सावरकरप्रेमी म्हणून आभारी आहे.”
शिवसनेतर्फे गेले अनेक वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून सर्व स्तरावरुन मागणी करण्यात येत आहे. लोकसभेतही काही महिन्यांपूर्वी शिवसेना खासदारांनी अधिवेशनकाळात प्रश्न उपस्थित केला होता.
भाजपने शिवसेनेचा हा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.