“निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं बोलावं”; उद्धव ठाकरेंची भाजपवर मार्मिक टीका
मुंबई: “हा सगळा खेळ खंडोबा बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं बोलून फेविकॉल लाऊन माणसे बसली तर अधिक योग्य होईल.” आजच्या राजकीय भूकंपाबाबात ही मार्मिक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी सोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
पुढे ते म्हणाले की, “देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली जो काही खेळ चाललेला आहे, हा खेळ संपूर्ण देशाला लाजिरवाणा आहे. “शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते आणि आमचं राजकारण टीव्हीवरच्या मालिका नसतात “रात्रीस खेळ चाले”, आम्ही जे काही करतो ते दिवसा ढवळ्या करतो.”
भाजपवर बरसत ते म्हणाले की, “जणू काही पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक करावा तसा फर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या महाराष्ट्रावर केला आहे. मर्द मावळे हे रणांगणात असतात, रात्रीस खेळ चाले करून सत्ता मिळवत नाही.”
एकूणच आज झालेल्या पत्रकार परिषेदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शिर्षस्थ नेते संतापलेले दिसले. बहुमत सिद्ध करण्याचा दिवस म्हणजे ३० नोव्हेंबर पर्यंत राजकीय वातावरण तापलेलेच राहील इतकं नक्की.