‘हे’ आहेत चेहऱ्यावरील मुरूम म्हणजेच पिंपल्स घालवण्याचे ‘६’ रामबाण उपाय
आयुर्वेद कुतूहल
तारुण्य पिटिका ( मुरूम, pimples)
आजाराच्या नावावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की ही व्याधी सहसा अधिक प्रमाणात तरुणाईत आढळते. त्याचे कारण ही तसेच आहे. वयानुसार शरीरात दोषांची स्थिती हि कमी अधिक प्रमाणात असते, जसे बालपणात कफ दोष, तरुण वयात पित्त आणि उतार वयात वात दोषाचे प्रमाण इतर दोषांच्या तुलनेत अधिक असते.
तारुण्यपिटिका हे विशेषतः पित्त दोषांच्या वृद्धीने होणारा रोग आहे आणि तरुण वयात सामान्यतः पित्त अधिक असतेच. आणि त्यात भर पडते ती चुकीच्या आहार आणि विहाराची.
तारुण्य पिटिकेवर आजकाल बरीच बाहय वापरासाठी क्रीम, फेस वॉश असे बाजारात उपलब्ध आहेत, परंतु आयुर्वेदात बाह्य उपचारा सोबत संपूर्ण आंतरिक उपचार आवश्यक आहेत असे मत आहे, त्याचबरोबर मुरूम ज्या कारणांनी उत्पन्न होतात त्यांचा शोध घेऊन त्यावर उपचार करावा असे आयुर्वेदाचे मत आहे.
मुरूम येण्याची काही सामान्य कारणे
१) प्राकृत वयात पित्त वाढल्यामुळे.
२) सतत रात्री जागरण, दिवसा झोपणे.
३) भूक नसतानाही खाणे, सतत चिप्स, चाट, ब्रेड प्रॉडक्ट्स deep fry पदार्थ, आंबवलेले पदार्थ अधिक प्रमाणात खारट , आंबट, अधिक तिखट खाणे.
४) शौचास, लघवी ला साफ न होणे अथवा त्यांचा वेग अडवणे.
५) तरुण मुलींमध्ये विशेषतः पाळीची तक्रार असल्यावर चेहऱ्यावर मुरूम येतात.
यावर उपाय काय?
सर्वप्रथम वरील कारणांपैकी कोणत्या कारणामुळे मुरूम आले आहेत त्याचा शोध घ्यावा व त्या नुसार उपचार सुरू करावेत.
(जे उपाय येथे सांगितले आहेत ते घरगुती आहेत, त्यांचा उपयोग होतो परंतु तरीसुद्धा इतर मूळ कारणासाठी उपचारार्थ वैद्याचा सल्ला अवश्य घ्यावा.)
१) सर्व प्रथम जी कारणे आपण टाळू शकतो अशा कारणे टाळावीत, जसे खाण्याच्या सवयी इत्यादी.
२) फळांमध्ये डाळिंब, आवळा, मोसंबी तसेच फळ भाज्यांमध्ये दोडके, भोपळा, दुधी, शिराळे, पडवळ अश्या भाज्यांचा समावेश असावा.
३) रात्री जागरण आवश्यकच असेल तर त्यावेळी पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नयेत तसेच सकाळी जेवायच्या आधी झोपावे , जेवणा नंतर नाही. रात्र पाळी करताना ह्याचे अनुसरण अवश्य करावे.
४) चेहऱ्यावर तेलकटपणा असल्यास मुरूम अधिक येतात अशा वेळी चेहरा धुण्यासाठी साबण न वापरता मसूर डाळीच्या पिठाचा अथवा उटण्याचा वापर करावा.
५) रात्री बिया असलेल्या काळ्या मनुका भिजत घालून सकाळी त्या खाव्यात जेणे करून अतिरिक्त पित्ताचे रेचन होते (कोठा जड असणाऱ्यांवर हा उपाय अधिक लागू होत नाही)
६) पित्तासाठी विरेचन हे श्रेष्ठ पंचकर्म आहे ह्यामुळे अधिक पित्ताचा यातून निचरा होतो आणि शरीर शुद्ध होते म्हणून वैद्याच्या सल्ल्याने एकदा तरी विरेचन करावे, निरोगी व्यक्तीनी देखील स्वस्थ राहण्यासाठी शरद ऋतुत म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात विरेचन अवश्य घ्यावे.
जोपर्यंत मूळ कारण नष्ट होत नाही तोपर्यंत मुरूम सतत येतच राहतात म्हणून मूळ कारण नष्ट करावे.
शेवटी म्हणतात ना कि सुंदरता हि आतूनच आली पाहिजे!
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत,
आयुष्य जगा आयुर्वेदासंगे ।।
लेख आवडला असल्यास शेअर करा । LIKE करा । कंमेंट करा
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center