महावितरणचा भोंगळ व संशयास्पद कारभार: पनवेल भिंगारी विभाग, (नेरे)
(टीम आपली समस्या) पनवेल : सध्या रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, पेण व खोपोली या तालुक्यांमध्ये महावितरणच्या कारभारात भोंगळ व संशयास्पद कारभार पाहायला मिळत आहे. वापरापेक्षा जास्त वीजबिल, वारंवार खराब होणारे मीटर, संबंधित मीटर चे फोटो वीजबिलावर नसणे तसेच कनिष्ठ अथवा वरिष्ठ अभियंत्यांची कार्यालयीन अनुपस्थिती अशा एक ना अनेक तक्रारी सध्या ह्या तालुक्यांमध्ये ऐकायला मिळत आहेत. शेवटी याची दाखल घेत ‘आपली समस्या’ या आमच्या सदराखाली आम्ही या सर्व समस्यांचा व संशयास्पद कारभाराचा धांडोळा घ्यायचे ठरवेल आहे. आज आपण पनवेल भिंगारी झोन पासून सुरुवात करूयात.
पनवेल – भिंगारी झोन : या झोनमध्ये बहुसंख्य पनवेल तालुक्यातील ग्रामीण भाग मोडतो. इथे सध्या वापरापेक्षा जास्त वीजबिल येणे, वीजबिलाच्या प्रतीत चालू मीटर चे छायाचित्र नसणे (१), प्रत्यक्ष न येता वीज वापराची (Reading) नोंद करणे, वीज मीटर खराब असणे तसेच स्थानिक लाईन मन (महावितरण) कर्मचाऱ्यांकडून संशयास्पद व्यवहार अशा तक्रारी सामान्यच आहेत. हा सारा परिसर ‘सिडको नैना’ परिक्षेत्रात मोडत असल्यामुळे नवनवीन निवासी वसाहती येथे बनत आहेत. लोकसंख्या वाढीचे गुणोत्तरही इतर भागांपेक्षा जास्त आहे. अशात महावितरणचा भोंगळ कारभार नजरेत सहज खुपतो.
याच परिक्षेत्रात नेरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ‘महालक्ष्मी नगर’ सारखी जवळपास १२०० घरांची सर्वात मोठी निवासी वसाहत आहे. इथले नागरिक तर सततच्या या त्रासाला कंटाळले आहेत. इथल्या नागरिकांच्या सर्वात जास्त समस्या ह्या वीज मीटर खराब असणे, बिलावरील वीजमीटर चा फोटो न वाचतायेण्या जोगा असणे, तसेच जास्त वीजबिल आल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी पिळवणूक या आहेत. या विषयी आम्ही येथील एक तक्रारदार श्री. मनोहर दळवी यांच्याशी वार्तालाप केला. त्यांनी तर गेल्या ५ वर्षांपासूनच्या वीज बिलांचा हवाला देत इथल्या भोंगळ कारभाराची जणू साक्षच दिलीय. ते म्हणतात कि, “दर महिन्याचे वीजबिल हे वापरापेक्षा जास्त येतेय. आम्ही तक्रारी केल्या पण न इथले महावितरणचे लाईनमन न भिंगारी येथील कनिष्ठ अथवा वरिष्ठ अभियंते कोणीच या तक्रारींची दखल घेत नाहीये. शेवटी हताश होऊन आम्ही सर्व तक्रारदारांना एकत्र घेऊन एक सह्यांची मोहीम करण्याचे व त्यानंतरही जर काही उपाय नाही झाला तर माहिती अधिकाराच्या आखत्यारीत अर्ज करून संबंधित अधिकाऱ्यांना वीज मीटर मध्ये चालणाऱ्या घोटाळ्यांबद्दल उत्तरे मागवणार आहोत. आता पहा ना ह्या महिन्याचे वीजबिल आम्हाला काल आले ज्यात वीज मीटर चा फोटोच नाही(२). आम्ही कसा विश्वास ठेवायचा या बिलावर? तसेच या तक्रारी घेऊन जेव्हा आम्ही भिंगारी, पनवेल येथील महावितरणच्या कार्यालयात जातो तेव्हा सर्वात आधी कनिष्ठ अंभियंत्यांच्या कचेरी बाहेरील कर्मचारी “साहेब बाहेर गेलेत, तुम्ही नंतर या” हे एकच पालुपद लावून पळवून लावतात. तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही.”
श्री. दळवींसारखे असंख्य महावितरणचे ग्राहक आहेत जे वर्षानुवर्षे या समस्यांचा सामना करत आहेत. जी तऱ्हा इथली तीच अवतीभवतीच्या गावांमधली. प्रामाणिकपणे वीजबिल भरणा करणाऱ्या नागरिकांना कसे लुबाडता येईल हेच इथल्या काही कर्मचाऱ्यांचे पैसे कमावण्याचे मूलभूत साधन झालेले आहे. महावितरणचे अधिकारी, अभियंते हे कार्यालयात उपलब्ध नसणे आणि त्यामुळे लोकांना आपला किमती वेळ वाया घालवत, हेलपाटे घालून नाहक मनस्ताप ओढवून घेणे हे नित्याचेच झालेय. अशा आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या लाईनमन पासून ते वरिष्ठ अभियंत्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. या सगळ्या शोध प्रवासात आम्हाला जागोजागी भ्रष्टाचाराचा गंध येत गेला. कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने कसे बरबटले आहेत हे जाणवलं. मग जाणवलं कि या सर्वांच्या व परिवारातील सदस्यांच्या संपत्तीचे उत्पन्नानुसार यथायोग्य मोजमाप का होऊ नये? पुढील लेखात आम्ही काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांशी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय सेवा दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. अल्लाउद्दीन शेख हे पुढील सदरात आपली मते व्यक्त करणार आहेत. प्रशासनाला याचा जाब विचारण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे CMD संजीव कुमार यांना आम्ही ट्विटरवर टॅग करून या समस्येबद्दल पाठपुरावा करणारच आहोत. पण आपणही ‘महाराष्ट्र वार्ता’ च्या ‘आपली समस्या’ या व्यासपिठाचा वापर करून आपल्या तक्रारी खालील ई-मेल आयडी वर पाठवू शकता.
आपल्या समस्या आम्हाला पाठवा आम्ही त्या आमच्या प्रभावी माध्यमावर मांडू. ‘आपली समस्या’ या आमच्या उपक्रमाच्या यशस्वितेचे (Success Ratio) प्रमाण ९०% आहे. ते १००% नेणे हे आमचे उद्दिष्ट आहे. धन्यवाद !
(२) मनोहर दळवी बिल :