दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं! असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
नांदेड: “राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची किती वाईट अवस्था राज्यात झाली आहे. मनसेचा पूर्ण अर्थ आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता आणि आता महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना आहे. आता मनसे उनसे झाली आहे, म्हणजे उमेदवार नसलेली सेना. लग्न दुसऱ्याच आणि हे नाचून राहिले आहेत. म्हणजे, रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुळं, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे”, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेडच्या भोकरमधील सभेत त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.
काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी नेताही भाडोत्री आणला. नवी पॅटर्न तयार केलाय अशोक चव्हाणांनी समर्थन मिळवण्यासाठी, असे म्हणत अशोक चव्हाण यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
नांदेडमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राशी काहीही देणंघेणं नाही ते महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवायला निघाले आहेत असं म्हणत टीका केली होती. त्या टीकेलाही आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला असं म्हणत या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तु्म्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही २ हजार २२६ कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसं विसरता? असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.