चौकीदार चोर असल्याचं सिद्ध होतं, पनवेल मधील बैठकीत अजित पवारांची टीका
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या असून सर्वच पक्षामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. पक्षाच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आजित पवार यांचे दौरे सुरु झाले आहेत.
अजित पवार यांनी आज पनवेलमधील राष्टवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा, असे आवाहन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना केले.
पत्रकारांनी अजित पवार यांना पार्थ पवार यांच्यासाठी आज आपण पनवेलमध्ये आला आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दर्शविला. आपण पनवेल मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल अजित पवार यांनी कोणतेच भाष्य केले नाही. पक्षातून कुणाला कुठुन उमेदवारी द्यायची याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी त्यांनी शिवसेना – भाजपवर टीका केली
इतर मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने हवाई हल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारच्या काळात सिलेंडर महाग झाले, बेरोजगारी वाढली, याशिवाय सीमेवर जवान शहीद झाले एवढे होऊन सुद्धा हे सरकार गप्प कसे बसू शकते अशी टीका त्यांनी केली. संरक्षण खात्यातून फाईल गायब होत आहे. याचाच अर्थ चौकीदार चोर असल्याचं सिद्ध होतं, असा आरोप अजित पवार यांनी भाजप सरकारवर केला.