“मी ही निवडणूक लढवणार”, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले जाहीर
मुंबई: पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आहे पण आपल्या सर्वांची जर परवानगी असेल आणि सर्व नेत्यांची इच्छा असेल तर मी ही निवडणूक लढवणार. आज मी इथे जाहीर करतो. असे म्हणत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळी येथील सभेत अखेर निवडणूक लढवण्यासंदर्भातला सस्पेन्स उघड केला.
ते म्हणाले की, “आपले प्रेम आणि आपले आशीर्वाद सोबत आहेत कारण मी फार मोठी झेप घेत आहे. गेली ५० वर्ष हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना जे तुम्ही प्रेम दिले हेच प्रेम तुम्ही मला देणार आहात. हेच प्रेम मी पुढे घेऊन जाणार आहे.”
यावेळी आदित्य यांनी आपण कोणत्या मुद्द्यांवर निवडणुक लढवणार आहोत हे स्पष्ट केलं. ते म्हणाले,
“हीच ती वेळ आहे कर्जमुक्त महाराष्ट्र, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र हिरवागार सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायची.”
आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पाहिले सदस्य असतील जे थेट निवडणुक लढवत आहेत. वरळी हा पुर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा गड होता, जो गेल्या निवडणुकीत शिवसेनेने काबीज केला. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी माजी मंत्री सचिन आहिर यांच्याकडून तो काबीज केला होता. नुकताच सचिन भाऊ आहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवणे आदित्य ठाकरे यांना सोप्पे जाणार असल्याचे दिसते.