आयुर्वेद कुतूहल भाग ५
जल ( पाणी)
जल हे जीवन आहे, हे आपणास माहीतच आहे. म्हणून ते कसही प्यावे असे नाही. ज्याप्रमाणे जीवनाला काही नियम आवश्यक आहेत त्याचप्रमाणे पाणी पितानाही काही नियम आवश्यक आहेत. कारण आयुर्वेदात सर्वच गोष्टी नियमाने चालतात.
● अवेळी पडलेल्या व पहिल्या पावसाचे पाणी कधीही सेवन करू नये.
● वर्षा ऋतु मध्ये नदी, तलाव इत्यादींचे जल पिणे व्यर्ज आहे, कारण अनेक दुषित पदार्थ पाण्यात जमिनीवरून मिसळतात, तसेच पाणी गढूळ झालेले असते.
● शरद ऋतूत म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून नदी आदींचे पाणी पिण्यास योग्य असते.
● नदी, विहीर इ. जलस्रोतांमधून पाणी काढताना ते सकाळीच काढावे कारण ते शुद्ध व शीतल असते.
● दूषित जल शुद्धी उपाय
१ अत्याधिक दूषित जल – पाणी उकळून घ्यावे
२ माध्यम दूषित जल – लोखंड/ मातीचा गोळा तापवून पाण्यात बुडवणे.
३ अल्प दूषित जल – ते उन्हात तापवावे
कुठल्याही परिस्थितीत पाणी हे गरम करणे आवश्यक आहे. तिन्ही प्रकारात फक्त तापमानाचा फरक आहे. सध्याच्या परिस्थितीत पाणी उकळून घेणे श्रेष्ठ.
● पाण्याचा अप्रिय गंध दूर करण्यासाठी त्यात नागकेशर, चाफा, वाळा हि द्रव्ये घालावीत.
◆ जलशोधक द्रव्य – आयुर्वेदात बरीच द्रव्ये वर्णन केली आहेत, परंतु सध्य स्थितीत तुरटीचा वापर पाणी शुद्ध करण्यास वापरतात.
◆ जल थंड करण्याचा उपाय – ह्यातही अनेक उपाय वर्णन केले आहेत पण त्यातील ओले कापड मातीच्या मडक्यात बांधून त्यात पाणी ठेवणे हा अति उपयुक्त उपाय आहे.
◆ शीतल जल सेवन योग्य व्यक्ती –
चक्कर येणे, giddiness, lethargy, पित्तज श्वास, उलटी होणे, रक्ताची उलटी अथवा नाकातून रक्त येणे
परंतु हे शीतल जल फ्रिज मधील नाही तर स्वभावातच थंड पाणी किव्वा माठातले गार पाणी प्यावे.
◆ शीतल जल पानास अयोग्य व्यक्ती –
छातीच्या बाजूस दुखणे, सर्दी, वातरोग, घसा पकडणे अथवा सुजणे, पोटफुगी, पोट जड वाटणे, नवज्वर, अधीक तेलकट तुपकट पदार्थ खाल्यावर.
◆ उष्ण जल पान –
भूक वाढवणारे, पाचन करणारे, हलके आहे. मूत्रशोधक, कंठरोग, उचकी, पोटफुगी, वात, कफ, नवज्वर, खोकला, दमा, जुनाट सर्दी, अपचन, छातीच्या फासळ्या दुखणे, ह्यांमध्ये श्रेष्ठ आहे.
◆ ज्यांनी मल बद्धतेची ( कॉन्स्टिपेशन) साठी औषध घेतली आहे त्यांनी गरम पाणी प्यावे.
◆ उष्ण जल हे सदैव पथ्यकर आहे ( आजारानुसार बदलावे)
◆ उष्ण जल निर्माण विधी –
पाणी उकळून त्याचा १/४ भाग शिल्लक ठेवावा ह्याला उष्णोदक म्हटले जाते. काही वेळा १/२ भाग ठेवला तरी चालतो. ( पाणी कमी अशुद्ध असल्यास) हे पाणी स्थूलता कमी करते.
◆ तापवून गार केलेले पाणी – (फ्रिज मधील नाही)
मद्यपानाने उत्पन्न रोगात, पित्तजन्य रोग, दाह, अतिसार, नाकातून, मल -मूत्रातुन, मुखातून रक्त येणे, मूर्च्छा, सतत तहान लागणे, उलट्या होणे, giddiness, इ. व्याधींमध्ये ह्याचा उपयोग होतो.
◆ आदल्या दिवशी उकळलेले पाणी दुसऱ्या दिवशी वापरू नये, त्यामुळे शरीरात आम्लता वाढते व कफ वाढतो.
◆ वाग्भट आचार्य मते जेवणाच्या आधी पाणी प्यायल्यास मनुष्य कृश होतो, मध्ये पाणी प्यायला तर सडपातळ होतो आणि शेवटी पाणी प्यायला तर स्थूल होतो.
◆ अजिर्णे भेषजं वारी जिर्णे वारी बल प्रदम।
भोजनेच अमृतं वारी भोजनांते विष प्रदम।।
अजीर्ण म्हणजे अन्न नीट पचले नसेल तर(गरम) पाणी हे औषधा प्रमाणे काम करते. म्हणजे अन्न सेवन त्यावेळी न करता तहान लागली की अल्प प्रमाणात गरम पाणी प्यावे.
अन्न पचले असताना पाणी प्याले की ते तृप्ती व बल प्रदान करते.
भोजन समयी आपण अल्प प्रमाणात पाणी घेतले तर ते अमृताप्रमाणे कार्य करते. जेवताना कोमट पाण्याचा घोट जिभेवरील जुनी चव काढतो व जिभेस नवीन रस ज्ञानासाठी तयार करतो. त्यामुळे घास नवीन असल्याचा आभास होतो व पाचनाही सुलभ होते.
भोजनाच्या अंती एकदम पाणी प्यायल्याने ते नीट पचत नाही परिणामी आम तयार होतो व तो विषप्रदच असतो.
● कोणत्या रोगांत जल अगदी कमी प्यावे –
भूक व चव नसणे, सतत सर्दी असणे, अधिक प्रमाणात लाळ गळणे, सूज, कृषता, दौर्बल्य, अपचन, उदररोग, कुष्ठ, ताप, डोळ्यांचे विकार, जखम झाली असल्यास, मधुमेह ( डायबीटीस नाही) .
● वाग्भटांनी निरोगी माणसानेही ग्रीष्म व शरद ऋतु सोडून अधिक प्रमाणात पाणी पिऊ नये असे सांगितले आहे. नाहीतर वरील रोग उद्भवू शकतात.
● ह्यामुळेच सकाळी उठुन उपाशी पोटी भरपूर पाणी पिणे व त्याच्यात हि मध आणि लिंबू पिळून पिणे हे आयुर्वेदाला मुळीच मान्य नाही.
● तसेच बाहेरून आल्यावर हृदय गती स्थिर होई पर्यंत व शरीराचे तापमान सामान्य होई पर्यंत पाणी पिऊ नये.
● पाणी एकदम पिऊ नये शांत पणे एक एक घोट प्यावा.
● अत्यम्बुपानात न विपच्यते अन्न निराम्बुपानाच्च स एव दोष:।
तस्मात नरो बहनीविवर्धनाय मुहूर्मुर्वारी पिबेदभुरि।।
अतिशय पाणी पिण्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, पाणी मुळीच न पिण्याने दोष निर्माण होतो. म्हणून थोडे थोडे पाणी वारंवार प्यावे ( तहान लागली तरच) .
पाण्याला तसेच जीवनालाही नियम लावणारा असा हा आयुर्वेद आहे. भेटु पुढील लेखात तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।।
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
लिंक क्लीक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी न चुकता आम्हाला YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)