सातारा लोकसभेचा मी राजीनामा देतो निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी : उदयनराजे भोसले भडकले
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इव्हिएम मतदानयंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे आता समोर येत आहे. निवडणूक आयोगानेही आधी जाहीर केलेली आकडेवारी सदर बाब लक्षात येताच आपल्या संकेतस्थळावरुन काढून टाकली. या साऱ्या पार्श्वभूमीवर पहिली तोफ साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्ट च्या मार्फत डागली आहे. त्यांनी खुद्द स्वतःच्या मतदार संघातील घोळ झालेल्या आकडेवारीचा तपशीलही दिला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलं आहे की सातारा लोकसभा मतदारसंघाचा मी राजीनामा देतो निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी.
खासदार उदयनराजे आपल्या पोस्ट मध्ये लिहितात, “ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. काय व्हायचेय ते होऊ द्या; मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या.”
“प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु सर्वसामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमातून जाणाऱ्या पैशाचा इव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार 300, तर इव्हीएमवर मतदान घेण्यासाठी 33 हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच साडेचार हजार कोटींपेक्षा जास्त खर्च इव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यातही किती पळवाटा आहेत. असे असताना त्या विषयातील तज्ज्ञ नसतानाही न्यायालये इव्हीएमबाबत आग्रही राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयच जर अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा?
निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे. माझ्याच लोकसभा मतदार संघात वाई मतदारसंघात 344, कोरेगावमध्ये पाच, कऱ्हाड उत्तरमध्ये 148, कऱ्हाड दक्षिणमध्ये पाच, पाटणमध्ये 97, तर सातारा मतदार संघात 75 मतांचा फरक आला आहे. अशाच प्रकारे देशातील 376 मतदार संघात झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आहे. निवडणूक आयोगाच्या साईटवरील माहितीतही तफावत असल्याचे स्पष्ट झाल्यावर ती माहितीच काढून टाकण्यात आली. व्हायरसमुळे माहिती गेली असे आयोग म्हणतो. मग, लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार?”