“नॅशनल रेकॉर्ड” व “एशिया पॅसिफीक रेकॉर्ड” ची नोंद
कोल्हापूर, दि. १९: लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानामधील स्वीप अंतर्गत कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर १०,४९५ विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारून मतदान करण्याचा संदेश दिला. यावेळी शहरातील ३८ हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवून जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदविण्यात मदत केली. ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचा “नॅशनल रेकॉर्ड” व “एशिया पॅसिफीक रेकॉर्ड ची नोंद झाली.
यावेळी मिळालेला सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षकांना समर्पित केला. यावेळी ते म्हणाले, देशस्तरावर नोंद झालेल्या या उपक्रमातून मतदारांना चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल. या उपक्रमाला मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरीक्त मनपा आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी (स्वीप) नीलकंठ करे, ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ. महेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने स्वीप (SVEEP- Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्हयातील सर्वच मतदारांपर्यंत संदेश जाईल की आपण बाहेर पडून ७ मे रोजी मतदान केले पाहिजे. लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोल्हापूर मनपाच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी कोल्हापूर जिल्हयातील मागील निवडणूकीच्या मतदान टक्केवारीत अधिक भर टाकत शंभर टक्के मतदानाजवळ जाऊ अशी आशा व्यक्त केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी लोकशाहीतील सर्वात मोठा सण असलेल्या निवडणूकीमधे नागरिकांनी आपला हक्क बजावला पाहिजे असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आपल्या लोकशाहीची, निवडणूक प्रक्रियेची माहिती अशा उपक्रमातून आतापासूनच दिली जात असल्याचे सांगितले. यानंतर ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ. महेश कदम यांनी १०,४९५ विद्यार्थ्यांनी विक्रमी नोंद केल्याचे सांगून मद्रास शहरानंतर भारतात असा उपक्रम नोंदविला गेल्याची घोषणा केली. या विक्रमी नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह डॉ. कदम यांनी जिल्हधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप नीलकंठ करे, सहायक नोडल वर्षा परिट, धायगुडे यांनी पार पाडले.