मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते हि हतबलता : राज ठाकरे
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभा निवडणूक प्रचाराची शुभारंभाची पुण्यातली पहिली सभा धुंवादार पावसामुळे रद्द करण्यात आली होती. पण काल या सभेची कसर राज ठाकरेंनी भरून काढली. यावेळी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना, भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा साऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.
वाचा राज ठाकरे यांच्या सभेतील ठळक मुद्दे
१) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला.
२) सव्वाशे वर्ष मराठेशाहीने ह्या संपूर्ण भूप्रदेशावर राज्य केलं होतं पण आपला इतिहास पोहचवला जात नाही. त्या वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार सरकारने करायचा असतो. पण हे सरकार पुतळ्यांची स्मारकं करण्याच्या घोषणेत मश्गुल.
३) अमोल यादव नावाच्या एका तरुणाने विमान बनवलं. नंतर त्याने ते मुख्यमंत्र्यांना दाखवलं. त्याला आश्वासन दिलं गेलं कि ‘ठाण्यात जमीन उपलब्ध करून देतो.’ वास्तवात जमीन दिली नाही. अखेर तो मुलगा सरकारी दिरंगाईला कंटाळून अमेरिकेत गेला. हेच तुमचं ‘मेक इन महाराष्ट्र’?
४) ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे कि, ‘माझी नोकरी कधीही जाऊ शकते’. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी.
५) बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो.
६) सरकारने घोषणा केली होती कि ‘१०० स्मार्टसिटी घडवणार’. काय झालं त्या योजनेचं? शहरात भरलेलं पाणी म्हणजे स्मार्ट सिटी का? कि वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी?
७) ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का?
८) पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते हि हतबलता.
९) आम्हाला विरोधासाठी विरोध करणारा ‘विरोधी पक्ष’ व्हायचं नाही. सरकारने एखादं चांगलं काम केलं तर खुल्या मनाने अभिनंदन करू पण जनतेवर अन्याय करायचा प्रयत्न झाला तर निडरपणाने सरकारला धारेवर धरू.