चंद्रकांतदादा म्हणतात सेनेकडून कुठलाच प्रस्ताव नाही तर संजय राऊत म्हणतात की शाह-ठाकरे यांच्यात ठरलं तोच प्रस्ताव
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन उपस्थित होते.
बैठक संपल्यावर माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणले की, “सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेकडून आद्यप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपचं दार खुलं आहे. “जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे जनतेच्या जनादेशाचा आदर केला जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार स्थापन करण्यात येणार आहे, यात शंकाच नाही” असे म्हणत मुख्यमंत्री पदावर असलेला आपला दावा मागे घेण्यास भाजप तयार नसल्याचा इशारा त्यांनी सेनेला दिला.
यानंतर काही वेळात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली की,”कुठल्याही मुद्द्यावर चर्चेसाठी भाजपने तयारी दर्शवली आहे. ही भूमिका आधी घेतली असती तर सत्तेचा तिढा वाढला नसता, एवढ्यात सरकार स्थापन झालं असतं. शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही हे भाजपंचं म्हणणं चुकीचं आहेत. कारण उद्धव ठाकरे-अमित शाह यांच्या बैठकीत जे ठरलं होतं, तोच प्रस्ताव आहे.”