गरज वाटली तर मी स्वतः काश्मीर ला जाईन : सरन्यायाधीश रंजन गोगोई
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर मधून कलम ३७० रद्दबातल केल्या संदर्भात दाखल याचिकांच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की जर गरज वाटली तर ते स्वतः काश्मीरचा दौरा करू शकतात. ते म्हणाले, “जर लोकं उच्च न्यायालयात पोहोचू शकत नसतील तर प्रकरण फार गंभीर आहे. मी स्वतः श्रीनगरला जाईन.” त्यांनी हे भाष्य दोन बाल हक्क कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका वकीलाद्वारे काश्मीर मधील लोकांना उच्च न्यायालयापर्यंत पोहोचण्यात होत असलेल्या अडथळ्यांबाबत केलेल्या आरोपांवर केले. मुख्य न्यायाधीशांनी या वकीलाला इशारा दिला की जर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या रिपोर्टमध्ये आरोपात विसंगती आढळली तर सुप्रीम कोर्ट त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावेल.
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना सर्वोच्च न्यायालयाने श्रीनगर, जम्मू, अनंतनाग आणि बारामुल्ला येथे जाण्याची परवानगी दिली आहे. फक्त यादरम्यान त्यांनी कोणत्याही प्रकारची भाषण बाजी अथवा यात्रा न करण्याची अट टाकण्यात आली आहे.