राम मंदिराची पहिली वीट रचण्यास शिवसैनिकांनी सज्ज राहावे; उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई: आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीबाबत महत्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला तसेच केंद्रातील मोदी सरकारकडे मागणी केली की राम मंदिराचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.
ते म्हणाले की “राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्या दिवसापासून आग्रही आहे. न्यायदेवतेला आमची विनंती आहे की लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो द्यावा. पण त्या पलीकडे जाऊन सरकारकडून आमची अपेक्षा आहे की जसं आपण ३७० कलम हा मुद्दा कोर्टात वाट न बघता आपल्या अधिकारात निर्णय घेतला आणि आपलं काश्मीर जे आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशाचा, हिंदुस्थानचा अविभाज्य भूभाग होता, आहे आणि राहील त्याबद्दल धाडसाने केंद्र सरकारने जे पाऊल उचलले तसचं धाडसी पाऊल राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा केंद्राने उचलावं अशी आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे.”
याच सोबत उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेड बाबतही महत्वपूर्ण वक्तव्य केलं. ते म्हणाले की जे नाणार प्रकल्पाचं झालं तेच आरे येथील मेट्रो कारशेडचं होईल.