महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये; राज ठाकरेंच मनसैनिकांना जाहीर आवाहन
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांत एकच गहजब उडाला. ईव्हीएम मशीन विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार सूड बुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप तात्काळ पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला.
परवा २२ तारखेला ई.डी. च्या कार्यालयात राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्तेही असतील असे दुपारीच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्ष नेत्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते होते. पण त्यानंतर थोडया वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक जाहीर निवेदन करत कार्यकर्त्यांना व नेत्यांना २२ तारखेला ई.डी. च्या कार्यालयात जाताना न येण्याचं आवाहन केलं. या निवेदनात ते म्हणाले की इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा.
सविस्तर जाहीर निवेदन
*जाहीर आवाहन*
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू. इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा.
सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.
तसंच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये.
आणि बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.
आपला नम्र
राज ठाकरे