भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहेत : विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे
भोकरदन: लोकसभा निवडणुकीत भले ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बहुमत मिळाले असेल तरी भोकरदनची अभूतपूर्व गर्दी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार येथे निवडून येणार हे निश्चित. फक्त ही उर्जा कायम ठेवा. असे काल विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे भोकरदन येथील शिवस्वराज्य यात्रेतील आपल्या भाषणात म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘ईडी’ तर्फे आलेल्या नोटिसीबाबत ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत जेव्हा राज ठाकरे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे तेव्हा भाजपच्या भल्याभल्यांची टरकायची. म्हणून राज ठाकरे यांना आज ईडीची नोटीस बजावली. भाजपविरोधात आवाज केला तर तो आवाज दाबला जात आहे. मग माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला प्रश्न पडतो की या देशात लोकशाही जिवंत आहे की नाही?”
पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, “भाजप आज पूर्णपणे भ्रष्टाचारात बरबटलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहे. महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारे भाजप स्वतःच राष्ट्रवादी‘युक्त’ होऊन बसले आहे.”
भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की, “इथले खासदार रावसाहेब दानवे यांना जनतेने अनेकवेळा संधी दिली. त्यांच्या मुलाला आमदारकी दिली पण ‘खाऊ’साहेब दानवेंनी नेहमी ‘चकवाच’ दिला. मुख्यमंत्र्यांसारखेच दबावतंत्र दानवे वापरत आहे. आपल्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जात आहेत. येत्या निवडणुकीत यांना निवडून न देता चकवा देऊयात.”