महाराष्ट्रात २००-२५० जागा जिंकू हे भाजप कशाच्या आधारावर म्हणतं? : राज ठाकरे
मुंबई: ईव्हीएम ला विरोध करण्यासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी मुंबईत सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन केले जाणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज झालेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत जाहीर केले.
विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली पाहिजे अशी भूमिका सर्व विरोधकांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षाच्या वतीने विशाल मोर्चा काढला जाणार आहे. ही जनभावना आहे. त्यामुळे लोकांचं म्हणणं काय आहे , ते आम्ही मांडणार आहोत असे अजित पवार म्हणाले. या दिवशी मतदारांना एका फॉर्म चे वाटप करण्यात येणार आहे ज्यात बॅलेट पेपर वर शिक्का मारूनच मत घ्यायचंय असा आग्रह नोंदवला जाणार आहे.
या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर आसूड ओढले. ते म्हणाले “महाराष्ट्रात २००-२५० जागा जिंकू हे भाजप कशाच्या आधारावर म्हणतं? आणि निकालाबाबत एवढाच विश्वास असेल तर निवडणुका मतपत्रिकेवर घ्यायला का घाबरता?”
पुढे लोकसभा निकालांबाबत संशय व्यक्त करताना ते म्हणाले की, “देशातील लोकसभेच्या ३७१ मतदारसंघात मतदान आणि मतमोजणीत फरक आढळला आहे आणि हा फरक मतदान यंत्रातील (EVM) फेरफारीमुळेच झाला. त्यामुळे या यंत्रणेवर विश्वास ठेवायचाच कसा? अशाने देशातील लोकशाही टिकेल कशी?”
एकूणच ‘ईव्हिएम’ च्या मुद्द्यावरून येत्या काळात वातावरण तापणार असल्याचे जाणवते. आजच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिक्षक भरती चे आ. कपिल पाटील, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, कर्नल सुधीर सावंत उपस्थित होते.