पुरोगामी असणं म्हणजे काय?; वाचा लेखक प्रतिक पुरी यांची सडेतोड मतं
पुरोगामी असणं ही एके काळी उत्कटता होती. नंतर ती आवड झाली. आता ती चेष्टेचा विषय झाली आहे. कारण पुरोगामी असणं म्हणजे काय हे इतरांना जसं समजत नाहीय तसंच ते स्वतःला पुरोगामी समजणाऱ्यांनाही समजत नाहीय. त्याचा मूलार्थ जरी पुढे जाणारा असा असला तरीही पुढे जाणं म्हणजे इतरांपेक्षा पुढे जाणं किंवा पुढे पुढे करणं नसून स्वतःपेक्षा पुढे जाणं असा आहे. मग तो किंवा ती कोणत्याही क्षेत्रांत असो. स्वतःपेक्षा पुढे कोणत्या बाबतीत जायचं? तर स्वतःच्याच विचारांच्या बाबतीत पुढे जायचं, स्वतःच्याच कर्मांच्या बाबतीत पुढे जायचं.
पुरोगामी कोण असतात?
जे भेदभाव करत नाही. जे सत्याचे पाठीराखे असतात. जे कोणाशीही पक्षपातीपणानं वागत नाही. जे आपल्या मित्राशी जसं वागतिल तसेच त्यांच्या विचार-विरोधकांशीही वागतात. (त्यांना शत्रू नसतात कारण ते कोणालाही आपला शत्रू मानत नाही.) जो न्याय ते स्वतःला लावतात तोच आपल्या घरच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना, ओळखिच्यांना आणि परकीयांनाही लावतात. जे केवळ स्वतःचाच नाही तर सर्वांचाच विचार करतात, त्यांत सजीवांसोबत निर्जीवांचाही समावेश असतो. त्यांच्या दृष्टीनं केवळ सत्य महत्त्वाचं असतं. ते केवळ सत्याचंच अनुसरण करतात.
पुरोगामी काय करतात?
ते कमी बोलतात. त्याहून जास्त काम करतात. त्याहून जास्त विचार करतात. ते विचार केल्याशिवाय काम करत नाहीत. काम केल्याशिवाय बोलत नाहीत. आपलं काम बोलावं हीच त्यांची मनीषा असते. ते चूकांना घाबरत नाहीत. चूक कबूल करायला लाजत नाहीत. चूक सुधारायला वेळ लावत नाहीत. ते सर्वांचं ऐकून घेतात. सर्वांच्या विचारांचा आदर करतात. ते कायम काळासोबत पुढे जात असतात. त्यामुळे त्यांचे विचारही बदलत असतात. पण काहीही झालं तरी ते सत्याची बाजू सोडत नाही.
पुरोगामी कोण होऊ शकतात?
कोणीही. ती एक प्रक्रिया आहे, प्रवास आहे. माणूस मरेपर्यंत तो प्रवास करत असतो. कोणताही माणूस पूर्णपणे कधीच पुरोगामी होऊ शकत नाही पण तो किंवा ती जर त्या प्रवासात असेल तर त्यांची प्रगती मात्र होत असते. पुरोगामी असणं म्हणजे सतत बदलाला तयार असणं. पुरोगामी व्यक्ति कदाचित व्यावहारीक दृष्टीनं मोठी, यशस्वी वगैरे होणार नाही. पण ती माणूस नक्कीच होईल. ज्यांना माणूस व्हायचं आहे त्यांना पुरोगामी होण्याशिवाय पर्याय नाही.