जाणून घ्या पावसाळ्यात तब्बेत चांगली ठेवण्यासाठी नेमका कोणता आहार घ्यायला हवा
आयुर्वेद कुतूहल वर्षा ऋतुचर्या ( पावसाळा)
दिनांक २१ जून ला सूर्याचे दक्षिणायन चालू होते आणि त्याच वेळी वर्षा ऋतूचा प्रारंभ होतो. म्हणून आपण आज ह्या ऋतु विषयी आयुर्वेदाचे मत पाहूया.
वर्षा ऋतु हा विसर्ग काळातील पहिला ऋतु जेव्हा सूर्य आपले उत्तरायण संपवून दक्षिणायन सुरु करतो. ह्यामुळे सूर्याचे तापमान कमी होते व दिवस लहान होत जातात आणि रात्र मोठी. वातावरणात उत्साह बल वाढते, म्हणूनच ह्या काळाला विसर्ग काळ म्हणतात.
- वर्षा ऋतु विसर्ग काळातील जरी असला तरी तो ग्रीष्म ऋतु नंतर लगेच येत असल्यामुळे शारीरिक बल कमी असते. म्हणूनच ह्या काळात रोगाचे प्रमाण अधिक असते.
- पावसाळ्यात नदी, सरोवर इ. पाणी बाहेरील वातावरणामुळे दूषित होते म्हणून त्याचे सेवन करू नये, ह्याला अपवाद म्हणजे कूप जल (विहिरीचे पाणी) हे त्यामानाने दूषित होत नसल्याने ग्रहण करावे मात्र उकळून, शहरात येणारे पाणी हे उकळूनच घ्यावे.
- बाहेरील दमट हवामान, शीतलता, अम्लपाकी जल ह्यामुळे ह्या ऋतु मध्ये अग्निमांद्य होते. पाचन शक्ती कमी झाल्याने पचायला हलके असाच आहार घ्यावा. अधिक श्रम, शेतीची कामे हि ह्यास अपवाद आहेत कारण ह्यामुळे भूक चांगली लागते व आहारही नीट पचतो.
- ह्या ऋतूमध्ये आहार हा शुष्क म्हणजे ज्यामुळे शरीरात ओलसर पणा तयार होणार नाही असा असावा, नवीन धान्य हे ओलसर असते म्हणूनच पचायला जड असते, ह्या ऋतूत जुन्या (१ वर्ष जुना) धान्याचा वापर करावा, नसेल तर असलेले धान्य कढईमध्ये भाजून घ्यावे जेणेकरून त्यातील जलांश जाऊन ते हलके होते (नवीन तांदळासाठी हे जास्त लागू पडते).
- मांसाहार करणाऱ्यांनी ह्याकाळात विविध मसाल्यांची फोडणी देऊन फक्त मांसरस सेवन करावा ( सूप). मसाल्यांमुळे मांस पचायला हलके होते. ह्याकाळात पाचन क्षमता कमी असल्याने तसेच दूषित जलामुळे मासे खाणे आयुर्वेदात निषिद्ध आहे.
- शाकाहारात युष म्हणजे कडधान्याचे सूप (विशेषतः मूग) मसाले वापरून तयार करावे, कडधान्याला मोड न आणता कडधान्ये वापरावीत. आहारामध्ये मधुर, आंबट, लवण रसांचा समावेश असावा, तसेच आहार उष्ण व स्निग्ध असावा.
- वर्षा ऋतूमध्ये मधाचे सेवन हितावह सांगितले आहे. मध वात कारक जरी असला तरी वर्षा ऋतूमध्ये तो शरीराचा अनावश्यक ओलसरपणा शोषून घेतो. व ते ह्या ऋतूत उपयुक्तच आहे.
- ह्या ऋतूत स्नानार्थ औषधी सिद्ध जल तसेच औषधाने धुपन केलेलेच वस्त्र धारण करावे असे आयुर्वेद सांगते. पावसाळ्यात कपडे सुकले तरीही एक प्रकारचा दमटपणा कपड्यात राहतो आणि त्या मध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होतो. किंबहुना म्हणूनच आयुर्वेदात निंबा सारख्या औषधी वनस्पतीचा धूप सांगितला आहे.
- पावसाळ्यात पिण्यासाठी सुंठ, धणे- जिरे यांनी सिद्ध जल सांगितले आहे. पाणी उकळताना हि औषधे अल्प प्रमाणात टाकून ते पाणी उकळावे. अथवा उकळून गार केलेल्या पाण्यात मध घालावे ह्यास मध्वाम्बु म्हणतात. मध घालताना पाणी गरम नसावे एवढेच.
- सध्याच्या काळात कडुनिंबाचा पाला अंघोळीसाठी व त्याची सुकलेली पाने व शेणी घरात धूप दाखवण्यासाठी वापरली तर पावसाळ्यातील जंतूंचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
- पावसाळ्यात जेव्हा दुर्दीन येतात म्हणजे जेव्हा सूर्य अजिबात दिसत नाही व फक्त पाउस आणि वारा असतो अशावेळीची काळजी अधिक प्रमाणात घ्यावी. पाणी पिताना गरमच प्यावे, आहार हलका उष्ण व स्निग्ध घ्यावा, मुगाचे सूप, मूग तांदळाची खिचडी, पेज, ज्वारीची भाकरी असा आहार असावा.
- उकळलेले पाणी त्याच दिवशी प्यावे दुसऱ्या दिवशी त्याचा अम्लविपाक झाल्याने ते त्याज्य असते. (पिण्यासाठी न वापरता इतर कामांसाठी उरलेले पाणी वापरावे जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही.)
- वर्षा ऋतूत अपचनाचा त्रास असेल तर ओवा व जिरे भाजून खावे तसेच फक्त गरम पाणी प्यावे नंतर वैद्याच्या सल्ल्याने उपचार करावेत.
- पावसाळ्यात वाताचा प्रकोप होतो म्हणून बस्ती सारख्या पंचकर्माने वैद्याच्या सल्ल्याने वाताचे शोधन करून घ्यावे.
- पावसाळ्यात येणाऱ्या भाज्यांचे सेवन हे त्या काळासाठी योग्यच आहे. म्हणून शेवर, फोडशी, अळू, शेवगा, टाकळा ह्या भाज्या जरूर सेवन कराव्यात.
भेटूया पुढील लेखात तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।
लेख आवडला असल्यास शेअर करा । LIKE करा । कंमेंट करा
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)