काश्मीर प्रश्नी भारत तिसऱ्या कोणाचीच मध्यस्ती सहन करू शकत नाही; भारताने टोचले ट्रम्प यांचे कान
वॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारताने खोडून टाकला आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविश कुमार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना असे कोणतेच आवाहन केलेले नाही. त्याहीपुढे व्हाईट हाऊस च्या अधिकृत निवेदनात काश्मीर प्रश्नाचा कुठेच उल्लेख नाही.
सध्या पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दरम्यान काल त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान ट्रम्प यांनी दावा केला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याजवळ काश्मीर प्रश्नी मदत मागितली होती. पण परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की काश्मीर मुद्द्यावर भारत तिसऱ्या कोणाचीच मध्यस्ती सहन करू शकत नाही. या नंतर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेही स्पष्ट केलं की काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणं गरजेचं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी असं वक्तव्य का केलं, त्या मागे त्यांची कोणती खेळी होती यावर आता खल चालू आहे.