स्त्री ही अबला नाही तर सबला आहे – डॉ. विद्या बाळ
स्त्रियांच्या बाबतीत एम्पॉवरमेंट हा इंग्रजी शब्द वापरला जातो पण खरं तर मला ‘सबलीकरण’ हा शब्द खूप आवडतो कारण एम्पॉवरमेंट मध्ये पावर हा शब्द येतो आणि सबलीकरणामध्ये हे संपूर्ण स्त्रीचे सक्षमीकरण असल्यासारखे वाटते. तिथे कोणाची पावर नाही. त्यामुळे आज विचारांची खरच गरज आहे. असे प्रतिपादन डॉ. विद्या बाळ यांनी आज पनवेल येथे केले.
‘संगीता नितीन जोशी सामाजिक विकास संस्था’ व ‘यशकल्प फाउंडेशन’ या संस्थांच्या वतीने सावित्रीबाई स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे काल दिनांक ११ मार्च २०१९ रोजी ‘आगरी समाज सभागृह’ येथे संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मुकेश उपाध्ये प्रस्तुत ‘बोल मराठी मातीचे’ या मराठी हिंदी गीत गायनाने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत यशकल्प फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त यशवंत बिडये यांनी केले. यावेळी ते म्हणाले, महाभारत आपण सर्वांनी पाहिले त्यामध्ये दुर्योधन दुशासन द्रौपदीची वस्त्र फेडताना दिसले परंतु श्रीकृष्ण वस्त्र पुरताना दिसले. आज स्त्री सशक्तीकरणाच्या आपण गप्पा करीत असलो तरी पण वस्त्र पुरवणारे श्रीकृष्ण फार कमी दिसतात; परंतु वस्त्रहरण करणारे दुर्योधन आणि दुशासन आज गल्लीबोळात दिसतात. या सर्वांपासून स्वतःला वाचवत स्वतःचं व्यक्तिमत्व सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना ज्या अडचणी येत आहेत त्यापासून दूर होऊन त्यांना मदत केली तरी पण खऱ्या अर्थाने स्त्रियांचा सन्मान केल्यासारखे आहे. म्हणून गेली दोन वर्ष या संस्था तसेच पनवेलमधील समविचारी संस्था संघटना यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले.
उपस्थितांपैकी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या मीनल ताई मोहाडीकर म्हणाल्या, महिलांनी उद्योजक क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे. त्यासाठी सामाजिक वातावरण व शासकीय योजना यांची योग्य ती माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अर्चना ठाकूर म्हणाल्या, विद्याताईंसारखी माणसं हा विचारांचा प्रवाह आहे. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यातून आपण थोडं थोडं तरी सर्वांनी घेऊन गेलो तरीपण समाजात सात्त्विकता निर्माण होईल. सन्मानाला उत्तर देताना अमरावतीच्या गुंजन गोळे म्हणाल्या, माझं लग्न झालं त्यादिवशी रक्तदान करून आम्ही नवीन नवीन संकल्प केले. लग्नात घेतलेल्या नवीन साड्या त्यावरती नवीन साडी मी विकत घेतलेली नाही आज येथून मला माहेरची साडी मिळाल्यासारखी वाटत आहे. त्यादिवशी एक बाळ दत्तक घेतलं आणि गोकुळ नावाचा प्रकल्प सुरू केला.
यावेळी खालील प्रमाणे सन्मान देण्यात आले.
साहित्य – (यदुनाथ थत्ते स्मृतिप्रीत्यर्थ) डॉ.विद्या बाळ, पुणे
सामाजिक – (गोविंदराव शिंदे स्मृतिप्रीत्यर्थ) गुंजन गोळे, अमरावती
सामाजिक – (पुंडलिक भोपी स्मृतिप्रीत्यर्थ) आरती नाईक, पनवेल
शैक्षणिक – (के. गो. लिमये उर्फ दादासाहेब लिमये स्मृतिप्रीत्यर्थ) वर्षा सावंत, मुंबई
पत्रकारिता – (ल. पा.वालेकर स्मृतिप्रीत्यर्थ) यामिनी कुलकर्णी, जळगाव
उद्योजिका – (प्रेमा पुरव स्मृतिप्रीत्यर्थ) मीनल मोहाडीकर, मुंबई व मेघा पाटील, पेण
कला,सांस्कृतिक – (स्मिता पाटील स्मृतिप्रीत्यर्थ) गीता पुराणिक, ठाणे
आरोग्य – (डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मृतिप्रीत्यर्थ) शुभदा देशमुख, गडचिरोली व संजीवनी गुणे, पनवेल
नशाबंदी – (महात्मा गांधी स्मृतिप्रीत्यर्थ) अर्पिता मुंबरकर, कणकवली
विज्ञान – (ए पी जे अब्दुल कलाम स्मृतिप्रीत्यर्थ) ज्योती पाडळकर, पनवेल
आदर्श संस्था – (संगीता नितीन जोशी सामाजिक विकास संस्था व यशकल्प फाऊंडेशन यांच्या वतीने) क्रांतिकारी सेवा संस्था, महाराष्ट्र
तसेच सहा महिला बचत गटांचाही सन्मान केला गेला त्यात एकता महिला बचत गट महाळूंगी, जागृत महिला बचत गट वावंजे, उपासना बचत गट आसरेवाडी, मागासवर्गीय स्वयंसहाय्यता महिला बचत गट नवीन पनवेल, मनोकामना महिला बचत गट कोळखे पेठ.
आभार प्रदर्शन राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला विंग कमांडर राजेंद्र महानुभाव, लायन्स क्लबच्या अध्यक्षा सिंधू रामचंद्रन, पुरोगामी पत्रकार संघटनेचे चे अध्यक्ष विजय सूर्यवंशी, सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सुभाषशेठ भोपी, नेरे गावच्या सरपंच श्रीमती म्हसकर तसेच सर्व बचत गटांचे प्रतिनिधी सर्व संस्थांचे प्रतिनिधी आदी मंडळी उपस्थित होती.