खरंच एवढ्या वर्षांत सर्व पक्षीय नेत्यांकडून कल्याणकरांचे कल्याण झाले आहे का?
खरंच गेल्या १० वर्षात आपल्या कल्याणमध्ये बदल घडला का…? आपले लाडके खासदार, कार्यसम्राट आमदार व तत्पर नगरसेवक यांनी आपआपल्या विभागात खरंंच विकास कामे केली आहेत का? दर पाच वर्षांनी ह्यांच्या प्रत्येकाच्या जाहिरनाम्यात, प्रचार सभेत आपण काय काम करणार आहोत ते बेंबीच्या देठापासून ओरडून आपणास सांगताना दिसतात पण प्रत्यक्ष मात्र काहीच होत नाही.
विकास कामांवर लक्ष न देता शहरात फक्त मोठ मोठी बॅनरबाजी करून आम्हीच जनतेचे सेवेकरी, आपला माणूस, प्रजा हीच सेवा ह्या वायफळ गोष्टी लिहून स्वतःची चेष्टा करून घेतात. आता ही लोकं परत आपल्या दारात भीक मागायला येतील आणि कधी ही पूर्ण न होणारी स्वप्ने दाखवून जातील, निवडणुका झाल्या की हीच नेते मंडळी आपल्या ठेंगा दाखवून भुर्रकन निघून जातील.
कल्याणकरांना कळकळीची विनंती आहे, खोट्या व मोठ मोठ्या रक्कमेचे आकडे असलेल्या जाहिरातींना फसू नका, खरंच कल्याणमध्ये गेल्या १०-१५ वर्षात जर ह्यांनी काही कामं केली असती तर ह्यांना आपला प्रचार करायची गरज पडली नसती. विकासाच्या नावावर मत मागणाऱ्यांनी किती सुंदर विकास केला ना आपल्या कल्याणाचा. आपल्या ऐतिहासिक कल्याणची किती बिकट अवस्था करून ठेवली आहे. आता हेच बघाना, आपला पत्रिपुल बंद होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्याला दुरुस्त करायचं अजून कोणी नावच घेत नाही. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा एकमेव मार्ग होता. पत्रिपुलाच्या ट्रॅफिकमध्ये जर अडकलात तर तुमचा तास दीड तास कसा निघून जातो ते देखील कळत नाही. पत्रिपुल प्रमाणेच लोकग्रामचा ब्रिज हा देखील बंद करण्यात आला आहे. तो का बंद केला याचे कारण देखील कोणाला महिती नाही. हा ब्रिज बंद करून जवळपास सहा महिने होतील त्या ब्रिजवर कोणत्याही प्रकारे डागडुजीचे काम देखील चालू नाही तरीसुद्धा तो ब्रिज बंद. याचा नाहक त्रास चक्की नाका, आदर्श नगर, मलंगगड याठिकाणी राहणाऱ्या लोकांना होत आहे. याच लोकांना आपले घर ते स्टेशन हा प्रवास आधी फक्त १०-१५ मिनीटमध्ये करता येत होता आता तोच प्रवास करायला त्यांना ३० मिनिटं लागतात.
बसलाय अस्वच्छतेचा शिक्का
अस्वच्छ शहरांच्या यादी मध्ये कल्याणचा उल्लेख होतो. हे आमचं हरित शहर? कल्याणच्या रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग बघायला मिळतील. अत्रे रंगमंदिर सोडले तर कल्याण मध्ये एकही नाट्य मंदिर नाही, तसेच नाना नानी पार्क देखील नाही. मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदान नाही. कल्याण शहराची परिस्थित एवढी वाईट असून देखील आपले आमदार, खासदार पक्षाच्या प्रचारात किंवा गणपती, नवरात्रीच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. विकासाच्या नावाखाली एकही काम न केलेल्या या लोकप्रतिनिधींना लाज वाटत नसेल का खोटी प्रचार पुस्तके किंवा जाहीरनाम्यात कामाचा आढावा देताना. बाहेरून येणार प्रत्येक पाहुणा कल्याण पूर्वेला थर्ड क्लास शहर, वाहतुक कोंडीचे शहर, घाणीचे साम्राज्य असलेले शहर अश्या अनेक प्रकारच्या पदव्या बहाल करून जातो.
कल्याणकर आता तरी जागे व्हा! अजून किती अपमान आपण सहन करायचा, हीच वेळ आहे आपल्या लोकप्रतिनीधींना जाब विचारण्याची. आपल्याला आता दादा, भाई, शेठ नको तर आपल्याला कल्याणचा खऱ्या अर्थाने विकास करणारा व्यक्ती हवा. आपण नववर्ष स्वागत यात्रेत, गणपती, दिवाळी मध्ये एकत्र येतो ना आता त्याच एकजुटीने आपण आपल्या कल्याण शहरासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आता नाही तर कधीच नाही. तुमचं अमूल्य मत वाया जाऊ देऊ नका. जाती, धर्माच्या नावावर कोणालाही मत देऊ नका. आपल्या लोकप्रतिनिधीची कामे बघून मत द्या. वाढती वाहतूक कोंडी, बंद पडलेले पूल, खड्डे, धुळीच साम्राज्य यातून आधी कल्याणकरांची सुटका करा आणि नंतरच निवडणूका घ्या??? काय वाटतं तुम्हाला….
मतदान करायचं की नाही??
© सोनाली केदू भवर