तिकीट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला?; अभिनेते सुमित राघवन यांचा उद्विग्न सवाल
नाशिक: नाटक-सिनेमा चालू असताना कोणाचा तरी मोबाईल वाजणे, मोठ-मोठ्याने बोलणे हे सध्या नित्याचेच झाले आहे. या सर्वांचा दर्दी प्रेक्षकांना त्रास होऊ शकतो याचा कोणी विचारच करताना दिसत नाही. आणि त्यातही जर ती जर नाटकासारखी कलाकृती असेल तर या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त त्रास होतो तो त्या नाटकात काम करणाऱ्या नट-नटिंना. संवाद विसरले जाऊ शकतात, एक लय असते ती लयही बिघडते आणि त्याहून पुढे म्हणजे एकाने केलं की मग दुसरे प्रेक्षकही चलता है म्हणत स्वतःही अशी कृती सहज करतात. प्रेक्षकांच्या याच अशा बेशिस्त वागण्याचा त्रास सुमित राघवन यांनाही झाला.
नाशिक येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात सुमित राघवन यांच्या ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ या नाटकाच्या प्रयोगा दरम्यान एका प्रेक्षकाचा मोबाईल खणाणला आणि या प्रेक्षकाला त्याची चूक कळावी म्हणून सुमीत राघवन यांनी प्रयोग थांबवला. आधीच या प्रयोगा दरम्यान इतर प्रेक्षकांकडूनही बराच व्यत्यय येत होता. या बाबत सुमित राघवन यांनी फेसबुक वर एक सविस्तर पोस्ट लिहून आपलं म्हणणं आणखीन स्पष्टपणे मांडलं आहे.
ते पुढे म्हणतात की तिकीट काढलं म्हणजे तुम्ही आम्हाला विकत घेतलं का? का म्हणून आम्ही नाटक करावं? असा अपमान करून घेण्या करीता का? असे बरेच सवाल त्यांनी उद्विग्नपणे शेवटी विचारले आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156921928857247&id=628157246
अशा बेशिस्त प्रेक्षकांच्या वागण्याचा त्रास आधीही काही नाट्य कलावंतांनी अनुभवला आहे. काही वर्षांपूर्वी विक्रम गोखले यांनीही अशाच प्रकारे नाटक थांबवत या वृत्तीचा निषेध केला होता. तर सुजाण प्रेक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी ओळखून मोबाईल सायलेंट वर ठेवायला हवा व जर दुसऱ्या प्रेक्षकांकडून जरा चूक होत असले तर त्याला तिथेच थांबवायलाही हवं.