Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

……आता या विंचवांच्या नांग्या मोडा!: कलम ३७० मुद्द्यावर शिवसेनेची मोदींकडे मागणी

……आता या विंचवांच्या नांग्या मोडा!: कलम ३७० मुद्द्यावर शिवसेनेची मोदींकडे मागणी

मुंबई: काश्मीर मुद्दा हा शिवसेनेचा प्राण असल्याचे म्हटले जाते. त्याची प्रचिती शिवसेना बाळासाहेबांच्या काळापासून वेळोवेळी देत आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्यानंतर एनडीए मधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने कलम ३७० हटवण्याची मागणी केली आहे. या बाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात विशेष अग्रलेखाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मेहबूबा मुफ्ती सईद तसेच नॅशनल कॉन्फरन्स चे फारूख अब्दुल्ला यांना विंचवाची उपमा देत नांग्या मोडण्याची मागणी केली आहे.

कश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच कश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका पाकिस्तानपासून नसून या नेत्यांपासून आहे. पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला आहे. आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

जम्मू-कश्मीरची समस्या ही पाकिस्तानात नसून प्रत्यक्ष आपल्या देशात आहे. जम्मू-कश्मीरात राष्ट्रपती राजवटीची मुदत सहा महिने वाढवण्यात आली. पुढील सहा महिन्यांत खोऱ्यातील वातावरण ठीकठाक केले जाईल. अमरनाथ यात्राही सुरू झाली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक होईल. कश्मीरातील मुख्य मुद्दा निवडणुका नसून 370 कलम हटवणे हा आहे. या कलमाने कश्मीरला जो विशेष दर्जा दिला आहे तो हिंदुस्थानचे स्वातंत्र्य आणि अखंडतेस छेद देणारा आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ठणकावून सांगितले की, ‘370 कलमाची व्यवस्था तात्पुरती आहे.’ याचा दुसरा अर्थ असा की, मोदी राजवट दिलेल्या शब्दास जागेल. हिंदुस्थानच्या पाठीत घुसलेला हा खंजीर काढला जाईल, पण कश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. अब्दुल्ला म्हणतात, 370 कलम तात्पुरते असेल तर कश्मीरचा हिंदुस्थानातील विलयदेखील तात्पुरताच समजा. याचा दुसरा अर्थ असा की, 370 हटवाल तर याद राखा! तिकडे दुसऱ्या नेत्या मेहबुबा मुफ्तीही फुदकल्या आहेत. हिंदुस्थानचा कायदा, घटना न मानता कश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व राखावे. आमचा हिंदुस्थानशी संबंध नाही. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत. आमचे लाड थांबवाल तर पाकिस्तान आम्हाला मांडीवर बसवायला तयार आहे अशा आरोळय़ा मारणाऱ्यांनी आता समजून घेतले पाहिजे की, दिल्लीत मोदींचे राज्य आहे. कश्मीरात

शांतता विकत घेण्याचे दिवस

संपले. आता दहशतवाद व धमक्यांना भीक न घालणारे सरकार आले. कश्मीरला गेल्या साठ-सत्तर वर्षांत देशाने भरपूर दिले. कश्मीरातील नवतरुण म्हणवून घेणाऱ्यांच्या हाती दगड आहेत व आमच्या सैन्यावर ते फेकले जातात. तेथील तरुणांच्या हातास काम नसल्याने ते ही दगडफेक करतात, असा दावा मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाचे नेते करतात तो हास्यास्पद आहे. हिंदुस्थानातील अनेक भागांत बेरोजगारी आहे. म्हणून हे बेरोजगार तरुण हाती बंदुका घेऊन बंड करीत नाहीत. महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांतच बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आकडा सरकारनेच विधानसभेत जाहीर केला. या शेतकऱ्यांनाही बंड पुकारण्याचा अधिकार होता, पण त्यांनी मरण पत्करले. हे दुर्दैव असले तरी कश्मीरातील ‘पत्थरबाज’ तरुणाईचे समर्थन करणाऱ्यांनी हे शेतकऱ्यांचे बलिदान लक्षात घेतले पाहिजे. आपण हिंदुस्थानात राहतो म्हणजे तुमच्यावर मोठे उपकारच करतो ही भावना आधी मोडून काढायला हवी. पाकिस्तान हा कंगाल झालेला देश. आता त्यांच्या कटोऱ्यात कुणी भीक टाकायला तयार नाही. दिवाळखोरी हेच त्यांचे भवितव्य आहे. तेथील जनता नरकयातना भोगत आहे. हे काय आमच्या कश्मीरातील लोकांना कळत नसावे? ते येथेच सुखात आहेत. मोदी आल्यापासून व आधीही हजारो कोटींची विकासकामे जम्मू-कश्मीरात होत आहेत ती कुणासाठी? रोजगार हवा असेल तर तेथे उद्योग आला पाहिजे, पर्यटन व्यवसाय सुरळीत पार पडला पाहिजे. शांतता नांदायला हवी.

तरुणांची माथी भडकवून

त्यांचा वापर करणाऱ्यांच्या नाड्या आवळायला हव्यात. त्यासाठी कठोर पावले उचलायलाच हवीत. कश्मीरात व्यापार-उद्योग वाढवायचा असेल तर कायदे बदलावे लागतील व त्यासाठी 370 कलम उखडावे लागेल. देशाच्या संसदेने लागू केलेला कायदा जम्मू-कश्मीरात लागू होत नाही. हा आमच्या संसदेचा अपमान ठरतो. संसद सर्वोच्च आहे. देशाच्या इंच इंच भूमीवर संसदेचा अधिकार आहे, पण जम्मू-कश्मीर, लडाख वगळून! हा संविधानाचा तमाशा थांबवायचा असेल तर 370 हटवणे हाच मार्ग आहे व गृहमंत्र्यांनी तसे संकेत दिले आहेत. डॉ. फारुख अब्दुल्लांसारखे नेते म्हणजे देशाला भार झाले आहेत. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. या बाईने विश्वचषक क्रिकेट सामन्यावरून जे अकलेचे चाँद-तारे तोडले त्यातूनच सर्व उघड होते. हिंदुस्थानी क्रिकेट संघाने भगव्या रंगाची ‘जर्सी’ घातल्यामुळेच त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला असे विषारी विधान या बयेने केले. हिंदुस्थानच्या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला हे तिचे दुःख आहे. हिंदुस्थानी संघाच्या भगव्या रंगाचे सोडा, पण पाकड्या संघाने तर हिरव्या रंगाची ‘जर्सी’ घालून मैदानावर मुल्लागिरी केली तरीही त्यांना माती का खावी लागली? हे असे नेतेच कश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका पाकिस्तानपासून नसून या नेत्यांपासून आहे. पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला आहे. आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *