महालक्ष्मीच्या दर्शनानंतर युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली असून, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणनिती आखण्यात येत आहे. त्यातच काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेत युतीचा प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती या भेटीनंतर समोर येत आहे.
२४ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन प्रचाराचा सुरुवात करणार आहेत. त्यानंतर कोल्हापुरमध्येच शिवसेना-भाजप युतीची एकत्रित सभा होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये शिवसेना २३ जागांवर तर भाजप २५ जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
या बैठकीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि सचिव मिलिंद नार्वेकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबादसह अन्य महत्वाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रचार मेळाव्यांवरही युतीचे एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.