भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कृष्णकुंज भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका
मुंबई/पनवेल, दि.२१: भारतीय जनता पक्षाचे पनवेल स्थित आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली. ही भेट झाल्यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मनसेची भूमिका स्पष्ट केली व नामकरण वादातील एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं.
मागील अनेक दिवसांपासून नवी मुंबई येथील होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यायचे यावरून शिवसेना व भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मोठा वाद उसळला होता. पनवेलस्थित भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी केली तर शिवसेनेने या विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी या वादातील एका अस्पर्शीत मुद्द्याला स्पर्श करत दोन्ही बाजूने चालू असलेल्या आंदोलनातील हवाच काढून टाकली. यावेळी ठाकरे म्हणाले की, “हे विमानतळ मूळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं एक्सटेन्शन असून याचं नाव कसं बदललं जाऊ शकतं? त्यातून या नव्या विमानतळावर फक्त आंतरराष्ट्रीय विमानांचच उड्डाण होणार असून त्यामुळे याचं नाव बदलण्यामागे काहीच आधार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज जर दिवंगत बाळासाहेब ठाकरे जीवंत असते, तरीही त्यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यासाठी सुचवलं असतं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण येथील आमदार राजू पाटील यांनीही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचंच नाव देण्याची राज्य सरकारकडे मागणी केली होती. परंतू पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचे या बाबीकडे लक्ष वेधल्यावर त्यांनीही नामकरणाचा मुद्दा निकाली निघाल्याचे स्पष्ट केले. एकूणच हे लॉजिक माहिती असूनही या प्रकरणी शिवसेना व भाजपकडून फक्त राजकारण केलं गेलं व ज्यात आपण फक्त बाहुले म्हणून खेळवले गेलो अशीच काहीशी प्रतिक्रिया स्थानिक पनवेल, उरण भागातील एकमेकांसमोर बाह्या सरसावून उभे ठाकलेल्या स्थानिक भूमिपुत्रांनी व्यक्त केली आहे.