काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन
उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): काँग्रेस हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. पण सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते सदस्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकदिलाने काँग्रेस पक्षाचे काम करा. आपापसातील भांडण-तंटे, हेवेदावे बाजूला ठेवून काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात १ नंबर वर कसा येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले.
रायगड जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची सभा आज रविवार दि. १७ ऑक्टोबर रोजी जोमा नारायण घरत समाज मंदिर हॉल, शेलघर, सेक्टर १६, उलवे नोड, ता-पनवेल येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी महेंद्र घरत यांनी रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगून त्यांना अधिक जोमाने एकनिष्ठने काम करण्यास सांगितले. यावेळी कोरोना काळात मृत्यू पावलेले आमदार माणिक जगताप, काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर ठाकूर तसेच कोरोना काळातील काँग्रेसचे दिवंगत पदाधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षीय भाषणात महेंद्र घरत यांनी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची जबाबदारी काय आहे. भविष्यात कसे काम करायचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध नवनियुक्त पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक तालुकाध्यक्ष यांनी आपापल्या तालुक्यातील समस्या व पक्षाचे काम कसे चालू आहे याबाबत माहिती दिली. माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट जे. जे. पाटील, ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर, जेष्ठ नेते जी. आर. पाटील,डॉ. भक्तीकुमार दवे, महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, नाना जगताप, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष-मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशीं, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, मार्तंड नाखवा आदी काँग्रेसचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.