“नागरिकत्व कायद्यामुळे ४० टक्के हिंदू भरडले जाणार”, मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निमंत्रणावरून मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. २६ डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीत चर्चा झाली.
या भेटी बाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की,
“आंदोलन शांततेत पार पाडावे या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे ४० टक्के हिंदू भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे,हे स्पष्ट केले. या कायद्यांचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतय.”
जवळपास १ तास चाललेल्या या बैठकीत दोघांमध्ये अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाली.
यावेळी धनराज वंजारी, डॉ.अरुण सावंत, आ. कपिल पाटील उपस्थित होते.