भारताकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POK) मधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त
मुंबई, दि. ०७: अखेर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाच. मध्यरात्री अंदाजे १:२८ वाजता भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POK) मधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. या ठिकाणी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या ९०० दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. या संपूर्ण कारवाईला ऑपरेशन ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आले.
भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी तळांवर हल्ले केले जिथून भारतावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
लष्करातर्फे अधिकृतरित्या सांगण्यात आले कि आमची कृती केंद्रित, मोजूनमापून केलेली आणि तणाव वाढू न देणारी आहे. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नाही. भारताने या तळांची निवड करताना आणि त्यावर कारवाई करताना अतिशय संयम दाखवला आहे. २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या घडवणाऱ्या क्रूर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली. या हल्ल्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात येईल या आमच्या वचनबद्धतेला आम्ही जागत आहोत.
