केंद्र सरकारने ४० निर्यात शुल्क आकारल्यामुळे शेतकर्यांनी घेतला खरेदी-विक्री रोखण्याचा निर्णय
नाशिक, दि. २१: लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये आज कांद्याचे व्यवहार बंद आहेत. केंद्र सरकारने देशात कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बेमुदत कालावधीसाठी खरेदी-विक्री रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. नाशिकसह महाराष्ट्रातले कांद्याचे कंटेनर निर्यातीसाठी निघालेले आहेत. त्यांच्याबाबत शुल्काचे काय निर्णय होणार तसेच शुल्कासंदर्भातल्या अन्य स्पष्टीकरणासाठी हा बंद पाळण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले.
देशातील कांद्याची स्थिती म्हणजेच मागणी आणि पुरवठा बघूनच केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेतला असावा. सरकारला शेतकरी आणि देशातील नागरिक असे दोघांचे हित बघावे लागते असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या काल नाशिकमध्ये बोलत होत्या. शेतकऱ्यांना कांदा निर्यातीला कोणतीही बंदी नाही. कांदा निर्यात शुल्क वाढीसंदर्भात संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेडकडून सवलतीच्या दरात होणारी कांदा विक्री ज्या राज्यांमध्ये कांद्याची मागणी आहे अशा ठिकाणीच होणार आहे, असं त्या म्हणाल्या.
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये(APMC) मात्र व्यवहार सुरळीत सुरू आहेत. समितीमध्ये आज ११० गाडी कांदा आवक झाली असून दर १८ ते २२ रूपये दरम्यान आहेत. या बंदला पाठिंबा देण्याबाबत आज संध्याकाळी बैठक घेवून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी दिली.
Source – AIR