थकित कर्जांचं प्रमाण साडे नऊ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा(RBI) अंदाज
येत्या सप्टेंबरपर्यंत देशातल्या थकित कर्जांचं प्रमाण आठ पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरून नऊ पूर्णांक पाच दशांश टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने वर्तवली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात हा दर ६ पूर्णांक ९ टक्के होता. मात्र या परिस्थितीतही बँकांकडे पुरेसं भांडवल उपलब्ध असेल असं रिझर्व्ह बँकेनं अर्धवार्षिक वित्तीय स्थिरतेच्या अहवालात म्हटलं आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारामुळं सध्या जागतिक पातळीवर आर्थिक सुधारणांचा वेग मंदावला आहे. अनेक प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये पुरवठा साखळीत अडथळे येत आहेत, महागाई वाढलेली आहे आणि पतधोरण आढाव्यात बदल नोंदवले जात आहेत, असंही बँकेनं म्हटलं आहे. देशात मात्र दुसऱ्या लाटेनंतर होत असलेल्या लसीकरणाच्या प्रगतीनं अर्थव्यवस्थेनं उभारी घेतली आहे. व्यावसायिक क्षेत्र आणि बँकांच्या कर्ज वितरणातही वाढ होते आहे, असंही रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.