अबब…मुंबईत पारा चाळीशीच्या जवळ
मुंबई: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसारच सोमवारी मुंबईचे कमाल तापमान आणखी वाढले असून, सांताक्रूझ येथे कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यंदाच्या वर्षातील मार्चमधील हे सर्वाधिक कमाल तापमान आहे. नवी मुंबई ४०, ठाणे ४२.८ आणि रायगडात ४३.५ कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी कुलाबा येथेही कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
कोरडे हवामान आणि नीरभ्र आकाशामुळे राज्यभरात उकाडा वाढला आहे. कोरड्या तापमानामध्ये येणाऱ्या वाऱ्यांनी अंगाची लाही-लाही होत होती येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल तापमानात मार्चच्या सरासरी कमाल तापमानापेक्षा तब्बल आठ अंशांची वाढ नोंदवली गेली. गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सर्वाधिक कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. पूर्वेकडील उष्ण वार्यांनी मध्य महाराष्ट्रसह मुंबई परिसराचाही पारा वाढला आहे.