हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर शाळा-कॉलेजांना सुट्टी, पण अद्याप सारे शांतच
मुंबई: महाराष्ट्रातल्या मुंबईसह अनेक भागात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर मुंबई ठाणे आणि कोकण विभागातील शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट केलंय की दिनांक १९ सप्टेंबर रोजी कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.” या वर्षीच्या पावसाळ्यात जवळपास तीन वेळा अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर शाळा कॉलेजांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. पण एखाद अपवाद वगळता नेमक्या त्याच दिवसात पावसानेही सुट्टी घेतल्याचे दिसते. हवामान खात्याच्या आजच्या इशाऱ्यानंतर लोकांनीही याच मुद्द्यावरून हवामान विभागाला ट्रोल करायला सुरुवात केलीय.