वयात येताना : रिमाची पहिली पाळी आणि …
आठवीत गेलेली रीमा पहिली पाळी आली तेव्हा थोडी बावरली, थोडी घाबरली. वयाने मोठी झाल्याची जाणीव तिच्या नाजूक मनात घर करून बसली. अचानक स्री व पुरूष यांतील फरक कळू लागला आणि ती चिंतातूर झाली….
अर्थातच तिच्या चौकस आईला या तिच्या मानसिक व शारीरिक बदलाची कल्पना होतीच. उचित संधी साधून आई ने विषय काढला…
“मातृत्व हे निसर्गाने स्त्रीला दिलेले सर्व श्रेष्ठ वरदानच होय, आणि तिची प्रथम पायरी म्हणजे मासिक पाळी सुरू होणे होय. ज्याला आपण आपल्या बोलीभाषेत वयात येणे असे म्हणतो. जसे एखादे मशीन चालवण्यासाठी, ती कशी काम करते, तिची थोडक्यात रचना काय हे जाणून घेण्याची आवश्यकता असते अगदी तसेच मासिक धर्म म्हणजे नेमकं काय आणि स्त्री गर्भाशय कसे काम करते याचे थोडक्यात विश्लेषण आपण करु.”
“स्त्रीयांमध्ये पाळी ही साधारण वयाच्या १२ व्या वर्षापासून ते ५०-५५ वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला येत असते. दर २८ दिवसांनी पाळी येते. असे असले तरी त्यात २-४ दिवस मागे पुढे होणे हे स्वाभाविक मानले जाते.
रजःस्त्राव ३ ते ५ दिवस होऊ शकतो.
मासिक धर्म हा सर्वच स्त्रियांच्या वाट्याला येतो” हे ऐकल्यावर रिमा च्या मनावरील ताण थोडा कमी होतो.
दर महिन्याला गर्भाशय स्त्री-बीजाची वाढ करते आणि गर्भ धारण करण्याची तयारी करते. परंतु शुक्र अणि स्त्री – बीजाचा संयोग झाला नाही, तर हीच गर्भ निर्माण करण्याची तयारी नष्ट होते आणि ती रजः स्वरुपात योनीमुखाद्वारे शरीराबाहेर टाकली जाते. अशी क्रिया दर महिन्याला घडते ज्यास ऋतुचक्र असे म्हटले जाते.
रिमा च्या शंकांचे निरसन तिच्या आईने अगदी योग्य व सोप्या शब्दात केले. ज्यामुळे ती आनंदी तर झालीच पण या नवीन बदलाला सामोरे जायला मानसिकरित्या तयारही झाली.
अशाप्रकारे पाळी कशी व का येते हे तुम्हालाही समजले असेलच, तर पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच पाळी संबंधित चर्चेसाठी व प्रश्नांची उकल करण्यासाठी…
धन्यवाद…
सर्वे अपि सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामय:।।
Dr Snehal Jagdale
BAMS
9769210718
‘Ayur Care clinic and Panchakarma Center’,
A1 mohatta nagar CHS, behind St Joseph school, Vikhroli West.
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर विषयाला बांधील नाही)