….पण जगदीश पाटील यांच्यावर अन्यान करणाऱ्या सिडको अधिकारी तसेच सत्यवान सूर्यवंशीवर काय कारवाई होईल ?
पनवेल, नवी मुंबई: दि. ६ मे पासून सिडकोच्या विरोधात सीबीडी बेलापूर येथे उपोषणास बसलेले चिंचपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकरी श्री. जगदीश पाटील व कुटुंबीय यांच्या प्रमुख मागण्यांपैकी १२.५० टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्याची मागणी मान्य केल्याचे पत्र दि. १७ मे रोजी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी त्यांना दिले. यानंतर गेले ११ दिवस चाललेले आमरण उपोषण अखेर त्यांनी मागे घेतले.
असे समजते की माध्यमांचा दबाव व जगदीश पाटील यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना तात्काळ हा निर्णय घेणे भाग पडले.
सिडको ने आपल्या पत्रात म्हटले आहे की करंजाडे सेक्टर-३ येथील भूखंड क्रमांक १७१ व १७३ अनुक्रमे ६५० चौ.मी. व १५० चौ.मी. हे जगदीश पाटील यांना देण्याचे मान्य केले आहे. पण चिंचपाडा येथील पाडलेल्या ६ कुटुंबांच्या घराबाबत त्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी कडे अंगुलीनिर्देश केला आहे.
पण आता खरा प्रश्न हा उपस्थित होतो की श्री. जगदीश पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ का आली व कोणी आणली? या सर्वांना त्यांच्या कृत्याबद्दल कोणती शिक्षा मिळणार आहे? जगदिश पाटील यांना सिडको कडून जो भूखंड खूप आधी मिळायला हवा होता त्या भूखंडावर ज्या सत्यवान सूर्यवंशी आणि परिवाराने अतिक्रमण केलं आहे त्यांच्यावर व ज्या अधिकाऱ्यांची या घोटाळ्यात उघड मदत होती त्या श्री. विशाल ढगे आणि तत्सम कामात कसूर करणारे अधिकारी (विजय पाटील, विनायक भोसले, राजेंद्र चव्हाण) यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार आहे. की त्यासाठीही न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील. बरं, महाराष्ट्र वार्ताच्या टीम ने जेव्हा या विषयाच्या सखोल अभ्यास केला तेव्हा कळले की हे सत्यवान सूर्यवंशी नावाचे गृहस्थ व त्यांच्या पत्नी सौ. सावित्री सत्यवान सूर्यवंशी यांनी या अतिक्रमित जागेवर अनधिकृत गाळे बांधून त्यातून मोठी संपत्ती मिळवली. शिवाय हे सगळे नाट्य चालू होते तेव्हा त्यांनी जगदीश पाटील व कुटुंबावर पनवेल पोलीस स्थानकात खोट्या तक्रारीही केल्या. हे म्हणजे असे झाले की उलटा चोर कोतवाल को डाटे. फेब्रुवारी महिन्यात तर कहरंच झाला जेव्हा जगदीश पाटील व कुटुंबियांची घरं पाडण्यात आली. या वेळी हा भूमिपुत्र आपल्या हक्काच्या जागेपासून पूर्णतःच वंचित झाला. पण खरी खंत या गोष्टीची वाटते की या सगळ्या नाट्यात उरण येथील स्थानिक शिवसेना आमदार मनोहर भोईर व काहीजण सोडले तर बाकी स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी, नवी मुंबई परिसरातले स्वतःला भूमीपुत्रांचे रक्षणकर्ते म्हणवून घेणारे पुढारी कोठे होते आणि त्यातही महत्वाचे काही सन्माननीय अपवाद वगळता इतरवेळी हळदी-लग्न समारंभात आपल्या मोठेपणाचा बडेजाव करणारे त्यांचेच समाज बांधव कुठे होते? अजूनही जगदिश पाटील यांना विश्वास नाही की जमीन ताब्यात येण्याची प्रक्रिया सहजा सहजी पूर्ण होईल. त्यांना स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवितास धोका पोहोचू शकतो अशी भीती सतावते आहे. कारण संबंधित भूखंडावर ज्या सूर्यवंशी नावाच्या इसमाने अतिक्रमण केले आहे त्याने या जागेवरील अनधिकृत बांधकाम तोडले गेले असूनही आपल्या गावावरून भोडोत्री गुंड आणून या जागेवर पाहऱ्यासाठी ठेवले आहेत. ही सर्व हकीकत वाचल्यावर तुम्हाला अनुपम खेर व बोमान इराणी यांच्या ‘खोसला का घोसला’ या चित्रपटाची आठवण आल्या वाचून राहणार नाही. महाराष्ट्र वार्ताची, आपली समस्या ची टीम जगदिश पाटील यांच्याबरोबर आहेच पण येत्या काळात पाहुयात की पनवेल-उरण मधील स्थानिक भूमिपुत्र त्यांच्या मदतीला, त्यांच्या सोबत राहतो का?
सरतेशेवटी सीईओ ढगे तसेच काही कामचुकार सिडको अधिकाऱ्यांवर व भूखंडावर अतिक्रमण केलेल्या सत्यवान सूर्यवंशी नावाच्या इसमावर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे विशेष महत्वाचे राहील. कारण भविष्यात ‘सिडको नैना’ या प्रकल्पात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी भूमीपुत्रांनो डोळे उघडे ठेवा, अवती-भवती होणाऱ्या बदलांचा सतत अभ्यास करा..चौकस राहा..