राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित
राज्यात गेल्या वर्षी अनेक ठिकाणी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. राज्य शासनाने केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला.
ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी 2 हजार 909 कोटी 51 लाख 9 हजार रुपयांची मदत वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता शेकऱ्यांना यापूर्वीच देण्यात आला होता. राज्य शासनाने 151 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी सुमारे 1 हजार 454 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आज देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.
आज दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 1 हजार 454 कोटी 75 लाख 54 हजार 680 एवढी रक्कम विभागीय आयुक्तांकडे देण्यात आली आहे. ही रक्कम लवकरात लवकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे निंबाळकर यांनी सांगितले. दुसऱ्या हप्त्यात नाशिक विभागाला 446.48 कोटी, अमरावती विभागास 237.18 कोटी, कोकण विभागाला सुमारे 7.06 कोटी, औरंगाबाद विभागास 525.29 कोटी, नागपूर विभागास 32.13 कोटी आणि पुणे विभागाला 206.59 कोटी रुपये देण्यात आले आहेत.