आता शांत न बसता पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवला पाहिजे – उद्धव ठाकरे
काल जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. ह्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दात निषेध केला आहे.
यावेळी बोलताना ‘या विषयाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले पाहिजे, सगळं जग आपल्यापाठीशी आहे. तेव्हा हिच वेळ आहे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवण्याची’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गुप्तचर विभागाने हल्ल्यापूर्वी इशारा दिला होता, इशारे देऊन सुद्धा हल्ला कसा होतो. मग अधिकारी नेमके करतात तरी काय? ज्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आता नुसत्या घोषणा देऊन किंवा दंड थोपटून काहीही होणार नाही. पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे तसेच आतंकवाद्यांना जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे. शांत बसणे मर्दानगी नव्हे. पाकिस्तानातील लोक आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहे. जनतेच्या मनात संताप असून जनता सरकारच्या पाठिशी आहे, सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना धडा शिकवला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.