“विश्वासघात तर झाला. पण आता रडण्याचे नाही तर लढण्याचे दिवस आहेत.”; देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
नवी मुंबई: नवी मुंबई येथे सध्या भाजपची राज्य परिषद चालू आहे. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणावीस यांनी शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.
यावेळी सेनेवर टीका करताना ते म्हणाले की, “विश्वासघात तर झाला. पण आता रडण्याचे नाही तर लढण्याचे दिवस आहेत. आपण सारे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.
२२ किल्ले दिले, तर ४४ किल्ले परत घेण्याची आपली ताकद आहे.” पुढे सेनेला आव्हान देताना ते म्हणाले की, “आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, त्यांच्या वंशजांचा अपमान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान. पण शिवसेना गप्प आहे. ‘शिदोरी’ मासिकावर बंदी टाकून दाखवा.”
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
१. नूतन अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन.
विधानसभेचा सामना जिंकणाऱ्या संघाचे ते कर्णधार कालही होते आणि आजही तुम्ही विजयी संघाचे कर्णधार.
२. सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपामध्येच होऊ शकते. ‘विरासत’मध्ये आपल्याकडे कुणाला काही मिळत नाही. पक्ष हे आपले परिवर्तनाचे माध्यम आहे आणि सच्चा कार्यकर्ता ही आपली बारुद आहे.
३. काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर भारताचा तिरंगा डौलाने फडकताना पाहणारे आपण भाग्यशाली कार्यकर्ते आहोत. प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण होताना पाहणारे आपण भाग्यशाली ठरणार आहोत.
४. प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येला जाऊन दर्शन जरूर घ्या, तेथे कदाचित दर्शनमात्राने हिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्हाला स्मरण होईल.
५. नागरिकता देणारा कायदा असताना जो गदारोळ उठविला जात आहे, तो साधा नाही. एक मोठे षडयंत्र त्यामागे आहे. सत्तेच्या तडफडीतून काही पक्ष देशात तणाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोठे मोठे नेते बुद्धिभेद करीत आहेत.
६. आम्ही सारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान मानतो. दुसरे संविधान कुणीही तयार करू शकत नाही. ऐकून घेण्याचे दिवस संपले, आता सुनवण्याचे दिवस आहेत.
७. विरोधासाठी विरोध करणार नाही. पण जनतेच्या विरोधातील एकही निर्णय खपवून घेणार नाही. सरकारमध्ये बसलेले चिंतामुक्त झाले, पण आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
८. आज महिलांवर प्रचंड अन्याय होत असताना सरकार गप्प आहे. २२ तारखेला प्रत्येक तहसीलस्थानी सरकारला जाब विचारला जाईल.
९. सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही, ते तसेच पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. तुम्ही तिघे एकत्र आहात ना? तुम्हाला कळून जाईल जनता आजही कुणाच्या बाजूने आहे.
१०. आपल्या विजयाची सुरूवात नवी मुंबईपासून होईल. औरंगाबाद महापालिकेवर सुद्धा भाजपाचाच झेंडा फडकेल. मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हे विजयी अभियान असेच सुरू राहील.